वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 05:00 IST2020-10-10T05:00:00+5:302020-10-10T05:00:26+5:30

वडसा वन विभागात वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, हरिण, ससे यासह विविध प्राणी आढळून येतात. वडसा वन विभागात दोन वर्षात वन विभागाच्या वतीने जनजागृतीचे काम जोमाने केले जात आहे. परंतु अनेकदा मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन वन्य जीवांचे आश्रयस्थान असलेले जंगल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. रानडुकर, सांबर, चितळ, ससे अशा वन्यप्राण्यांच्या शिकारीही झाल्या. परंतु पुराव्याअभावी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नाही.

The need for wildlife conservation | वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज

वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज

ठळक मुद्देवडसा वन विभाग : वन्यप्राणी मानव संघर्ष वाढल्याने उपाययोजनांची आवश्यकता

प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के वनक्षेत्र आहे. वनात विविध प्रजातींचे प्राणी आहेत. परंतु मानवाकडून सातत्त्याने अवैध वृक्षतोड व वनावर अतिक्रमण केले जात असल्याने वन्यजीवांचे संरक्षण अडचणीत आले आहे. वडसा वन विभागातील विविध प्रजातींचे प्राणी झपाट्याने घटत असल्याने दिसून येते. त्यामुळे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष धोरण राबविणे आवश्यक आहे.
वडसा वन विभागात वाघ, बिबट, अस्वल, तडस, रानगवे, चितळ, सांबर, नीलगाय, हरिण, ससे यासह विविध प्राणी आढळून येतात. वडसा वन विभागात दोन वर्षात वन विभागाच्या वतीने जनजागृतीचे काम जोमाने केले जात आहे. परंतु अनेकदा मानव व वन्य प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होऊन वन्य जीवांचे आश्रयस्थान असलेले जंगल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. रानडुकर, सांबर, चितळ, ससे अशा वन्यप्राण्यांच्या शिकारीही झाल्या. परंतु पुराव्याअभावी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नाही. शिकार करणारे गुन्हेगार आजही मुक्तपणे संचार करताना दिसून येतात. राज्यातील प्रस्तावित ३१२ जंगलापैकी १७० जंगल क्षेत्र गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. निम्मे जंगल वन विकास महामंडळांतर्गत असून जंगल कामगार सहकारी संस्था कुपकामे व वनहक्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट होत आहे. मागील सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला होता. परंतु किती रोपटे जगली हाही प्रश्नच आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणचे जंगल तोडून त्या ठिकाणी मानवीकृत जंगल तयार करण्यात आले. नैसर्गिकरित्या जंगल तोडून जेव्हा वृक्षारोपण केले जाते. तेव्हा झुडपी जंगलाची कत्तल होते. त्यामुळे जंगलात राहणारे तृणभक्षी हरिण, ससे यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी अन्नसाखळी तुटते. शिकारीचा प्रश्न निर्माण होत असल्याने तृणभक्षी प्राण्यांवर अवलंबून असणारे प्राणीसुद्धा जंगलात राहत नाही. त्यामुळे वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेऊन मानवी बळी घेतात.

वन्यजीवांची लोकवस्तीकडे धाव
कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी प्राणी गणना होऊ शकली नाही. २०१९ मध्ये झालेल्या प्राणी गणनेनुसार वडसा वन विभागात १० अस्वल, ३४ चितळ, ६२ नीलगाय, ४ सांबर आढळून आले होते. परंतु जंगलात फेरफटका मारल्यानंतर हमखास दिसणारे हरिण, भेडकी, रानमांजर यासारखे वन्यजीव दिसून आले नाही. मागील वर्षात किती वन्यजीव नष्ट झाले. याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. वडसा वन विभागातील तृणभक्षी प्राण्याची संख्या घटल्याने वन्यजीवांची लोकवस्तीकडे धाव सुरू झाली आहे. त्यामुळे मानव व वन्यप्राणी असा संघर्ष वाढला आहे.

Web Title: The need for wildlife conservation