सपाटीकरण झाले डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:35+5:30
नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या येथे चिखलात अनेक वाहने चिखलात फसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : चामोर्शी-घोट मार्गावर गौरीपूरनजीक पाच वर्षापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर चार वर्ष पुलालगत रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले नाही. यंदाच्या उन्हाळ्यात सपाटीकरण करण्यात आले. परंतु येथे गिट्टी व मुरूम न टाकता माती टाकण्यात आल्याने सध्या या ठिकाणी वाहने फसत आहेत. तसेच इतर वाहनधारकांनाही चिखलाचा सामना करावा लागत आहे.
चामोर्शी वरून चार ते पाच किलोमिटरवर असलेल्या गौरीपूरनजीक पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत. पाच वर्षापूर्वी येथे पुलाचे बांधकाम झाले. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गिट्टी व मुरूम टाकणे आवश्यक होते. परंतु सदर काम करण्यात आले नाही. नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या येथे चिखलात अनेक वाहने चिखलात फसत आहेत. दुचाकी वाहनधारक घसरून पडत आहेत. या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गिट्टी, मुरूम टाकून डांबरीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी गौरीपूरसह घोट परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे.
पुलावरील खड्डे धोकादायक
मकेपल्ली व माडेआमगावच्या मधोमध असलेल्या नाल्यावरील पुलावर दोन मोठे खड्डे पडले आहेत. सदर मार्ग चामोर्शी रेखेगाव, मकेपल्ली, माडेआमगाव, रेगडी, विकासपल्ली, एटापल्ली कसनसूरला जोडणारा आहे. मकेपल्ली व माडेआमगाव या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दिवस-रात्र वाहने आवागमन करीत असतात. त्यामुळे पुलावर पडलेल्या खड्ड्यात वाहन कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.