आरोग्य सेवकांच्या अर्ध्या जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:16+5:30
ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर हे कीटकजन्य आजार व मधूमेह, कॅन्सर आदी असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध घेतात. प्रत्येक घरी भेट देऊन विचारणा करणे हे आरोग्य सेवकाचे ठरलेले काम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा दूत मानल्या जाणाऱ्या आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांच्या जिल्ह्यात अर्ध्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा डोलारा कमजोर झाला असून आरोग्य सेवेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
जिल्ह्यात एकूण ४७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३७६ उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची नेमणूक राहते. पुरूष आरोग्य सेवकांच्या एकूण २९८ जागा मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १९० जागा भरण्यात आल्या आहेत. १०८ रिक्त आहेत. महिला आरोग्य सेवकांच्या ५५३ जागा ांजूर आहेत. त्यापैकी ३४१ जागा भरल्या असून २१२ रिक्त आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर हे कीटकजन्य आजार व मधूमेह, कॅन्सर आदी असंसर्गजन्य आजारांच्या रूग्णांचा शोध घेतात. प्रत्येक घरी भेट देऊन विचारणा करणे हे आरोग्य सेवकाचे ठरलेले काम आहे. त्यासाठीच घराच्या भिंतीवर आरोग्य सेवकाच्या सहीचा आराखडा तयार केला राहते. या आराखड्यामध्ये किती तारखेला त्या घरी भेट दिली, याची नोंद करण्यासाठी संबंधित आरोग्य सेवक तारखेसह सही करतात.
आरोग्य सेविकेकडे प्रामुख्याने माता व बाल संगोपनाशी संबंधित काम राहतात. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांचेही विशेष महत्त्व आहे. जवळपास निम्मी पदे रिक्त असल्याने एका आरोग्य सेवकाकडे दोन ते तीन आरोग्य केंद्रांमध्ये येणाºया गावांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
दोन आरोग्य केंद्रांतर्गत पाच ते सहा गावे येतात. एवढ्या गावांमधील प्रत्येक घराला भेट देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रोगांचे निदान होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहेत.
शेवटच्या घटकाला सेवा देणे झाले कठीण
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी फारशी जनजागृती नाही. त्यामुळे एखादा आजार झाल्यानंतर जोपर्यंत त्या आजाराचा त्रास वाढत नाही, तोपर्यंत ते डॉक्टरांकडे जात नाही किंवा आरोग्य सेवकालाही कळवत नाही. त्यामुळे गंभीर स्वरूपातच रूग्णालयात भरती होते. काही रूग्ण तर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले राहतात. अशा रूग्णांना वाचविणे कठिण होते. त्यामुळे आरोग्य सेवकाचे पद महत्त्वाचे आहे. आरोग्य सेविका गरोदर माता व बाल संगोपनाचे काम करते. जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या लक्षात घेतली तर आरोग्य सेविकेचे महत्त्व अधोरेखित होते.