पूरग्रस्तांना लवकरच मदत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:00 AM2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे करून नुकसानाचा अंदाज येताच शासकीय मदतीचेही वाटप केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी शक्यतो त्यांना आवश्यकता असलेल्या वस्तूंच्या स्वरूपात मदत पाठवावी किंवा आर्थिक मदत द्यायची असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतच द्यावी, असे आवाहन केले.
अनेक वर्षानंतर भामरागड तालुक्यात यावर्षी जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन पशुहाणीही झाली. अनेकांच्या शेतीचेही नुकसान झाले. या सर्व नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी भामरागड तालुक्यातील महसूल कर्मचाºयांच्या दिमतीला बाहेरील तालुक्यातील तलाठ्यांना पाठविण्यात आले आहे. परंतू पंचनामे करण्यासाठी गावोगावी पोहोचण्यातही नाल्यांच्या अडचणी येत आहे. तसेच आरोग्य विभागाचीही जिल्हास्तरीय चमू सर्व गावांमध्ये जाऊन तपासणी करीत आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजारांपासून वाचण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सध्या उकळूनच पाणी प्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी १० अभियंत्यांना तर पशुंचे नुकसान पाहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयांसह दानशूर व्यक्तिंकडून भामरागडवासियांसाठी वस्तूरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने गुंडुरवाही, कोटपर्सी गावात जाऊन पूरग्रस्तांना दैनंदिन वस्तूंची मदत केली. दुर्गम भाग असल्याने त्या गावांना जाण्यासाठी चांगले रस्ते नाही. तेथील ४ घरे उद्धस्त झाली आहेत. तहसीलदार कैलास अंडील प्रत्येक नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धावपळ करीत आहे.
निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदारांमध्ये आणखी २०३० मतदारांची भर पडली आहे, तर ९२६ मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसार जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमिळून ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सिंह व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी दिली. यावेळी ना.तहसीलदार विवेक चडगुलवार हेसुद्धा उपस्थित होते.