तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:21 IST2026-05-06T13:19:12+5:302026-05-06T13:21:09+5:30
Tamil Nadu Politics: तामिळनाडू विधानसभेत जोरदार मुसंडी मारणाऱ्या थलपती विजय यांच्या पक्षाला एआयएडीएमके बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाने जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत टीव्हीके यांनी १०८ जागा जिंकल्या असून बहुमतासाठी त्यांना फक्त १० जगांची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर एआयएडीएमके यांनी टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे.
राज्यात १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीकेला आता एआयएडीएमकेच्या ४७ आमदारांचा पाठिंबा मिळणार आहे. हा निर्णय सहजासहजी झाला नसून, एआयएडीएमकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत नाट्य घडले. पक्षाचे ज्येष्ठ नेते सी.व्ही. षणमुगम आणि एस.पी. वेलुमणी यांनी हा निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पक्षाच्या ४७ पैकी बहुतांश आमदारांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची मागणी केली. सी.व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली ३० हून अधिक आमदारांनी एडप्पाडी पलानीस्वामी यांना असा इशारा दिला होता की, जर पक्षश्रेष्ठींनी त्वरित निर्णय घेतला नाही, तर ते थेट पक्ष सोडून विजय यांना पाठिंबा देतील.
तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ निकाल
| पक्ष | जागा |
| टीव्हीके | १०८ |
| डीएमके | ५९ |
| एआयएडीएमके | ४७ |
| काँग्रेस | ०५ |
| पीएमके | ०४ |
शपथविधी कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात नव्या सरकारच्या शपथविधीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर हा भव्य सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. राज्य सचिवालयाचे सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली असून ७ मे ही तारीख निश्चित मानली जात आहे.
भारतीय राजकारणातील मोठी घटना
तामिळनाडूच्या राजकारणात सध्या थलापती विजय एका भक्कम स्थितीत आहेत. प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि पहिल्याच प्रयत्नात सत्तेच्या जवळ पोहोचणे, ही भारतीय राजकारणातील एक मोठी घटना मानली जात आहे. आता पूर्ण ताकदीनिशी विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत.