एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:39 IST2026-05-06T13:38:53+5:302026-05-06T13:39:24+5:30
दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये होळीच्या दिवशी झालेल्या तरुण भूतोलिया हत्या प्रकरणात पोलिसांनी २० आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
राजधानी दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात होळीच्या दिवशी झालेल्या तरुण भूतोलिया या तरुणाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी द्वारका न्यायालयात तब्बल ५०० पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हत्येत कसे झाले, याचा थरारक तपशील या रिपोर्टमध्ये मांडण्यात आला आहे.
काय आहे 'त्या' दिवशीची घटना?
ही घटना ४ मार्च रोजी होळीच्या दिवशी घडली होती. एका लहान मुलीने फेकलेला पाण्याचा फुगा शेजारी राहणाऱ्या एका महिलेला लागला. या छोट्याशा कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, हा वाद केवळ फुग्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे जुनी रंजिश आणि पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते. आरोपींनी तरुणला त्याच्या घराजवळ गाठले आणि लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
२० आरोपी आणि ५०० पानांचा पुरावा
या प्रकरणात पोलिसांनी एकूण २० जणांना आरोपी बनवले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असून, त्यांचा खटला 'जुवेनाइल जस्टिस बोर्डा'कडे सोपवण्यात आला आहे. उर्वरित १८ आरोपींविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि विशेष म्हणजे SC/ST कायद्यांतर्गत कठोर कलमे लावली आहेत. खुनाचा गुन्हा (कलम १०३(२)) आणि दंगल भडकवणे यांसारख्या गंभीर आरोपांचा यात समावेश आहे.
सीसीटीव्ही आणि साक्षीदारांचा आधार
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी महत्त्वाचा पुरावा म्हणून घेतल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. पोलीस या फरार आरोपींच्या शोधात सतत छापेमारी करत आहेत.