रस्ता गुणवत्ता तपासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:35 AM2021-03-05T04:35:52+5:302021-03-05T04:35:52+5:30

आरमाेरी : करोडो रुपये खर्च करून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते; मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याने अल्पावधीतच रस्ता ...

Check road quality | रस्ता गुणवत्ता तपासा

रस्ता गुणवत्ता तपासा

Next

आरमाेरी : करोडो रुपये खर्च करून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते; मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याने अल्पावधीतच रस्ता उखडत असल्याने शासनाला मोठा फटका बसत असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी, रस्त्याची दुरवस्था झाल्यास कंत्राटदाराला दोषी ठरवून त्याच्याकडून भरपाई घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

स्पर्धा परीक्षेचे वर्ग भरविण्याची मागणी

चामाेर्शी : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी लॉकडाऊनमध्ये बार्टीतर्फे माेफत स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेण्यात आले. याचा अनेक गरजवंतांना फायदा झाला. अशा प्रकारचे वर्ग पुन्हा भरविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलत आहे. शहरात याबाबत शिकवणी वर्गातून माहिती मिळते; मात्र ग्रामीण भागातील युवकांकडे अशी कुठल्या प्रकारची व्यवस्था राहत नसल्याने त्यांना अडचण जात आहे.

एसटीचे तिकीट कमी करण्याची मागणी

अहेरी : लाॅकडाऊननंतर आता एसटी सुरू झाली आहे; मात्र तिकीट जास्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीचे तिकीट कमी करण्याची मागणी केली जात आहे.

स्वच्छता मोहीम गतिमान करावी

आष्टी : शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत; मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आळा घाला

कुरखेडा : शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक दहशतीत आहेत. अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बंदी घालणे गरजेचे आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा

घाेट : पंतप्रधान जन-धन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत; मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एटापल्लीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

एटापल्ली : मागील काही दिवसांपासून डास व कीटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फवारणी करण्याची मागणी केली आहे.

नियमित लाइनमन नसल्याने त्रास

काेरची : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाइनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

नागरिकांना अद्यापही रस्त्यांची प्रतीक्षा

वैरागड : रस्त्यामुळे गावाचा विकास होतो; मात्र पक्के रस्तेच नसल्यास विकास खुंटतो. तालुक्यातील काही रस्ते पक्के नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेविका कमी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करते; मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दर हजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.

ओपन स्पेसमुळे दुर्गंधीत होत आहे वाढ

गडचिरोली : न. प. प्रशासनाच्यावतीने लाखो रुपये खर्च करून वॉर्डा-वॉर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षण भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले; मात्र या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने तिथे कचरा टाकला जात आहे. दाराला कुलूप नाही. ओपन स्पेस विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.

दूध शीतकरण केंद्र अडगळीत

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. सदर केंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. मागील काही वर्षांत दुधाळ जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढले असून, दूध खरेदी केंद्र व शीतकरण केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.

सिरोंचातील बंद पथदिवे बदलवा

सिरोंचा : शहरातील काही वॉर्डातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या भागातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास आवागमन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बंद पथदिवे तत्काळ बदलावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प

एटापल्ली : तालुक्यातील दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा अनेक दिवसांपासून ठप्प आहे. करोडो रुपये खर्च करून अनेक ठिकाणी बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचे मनोरे उभारण्यात आले; मात्र सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे.

कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

आलापल्ली : शहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. उलट काही लोक गावाबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. अशा नागरिकांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

खाद्यपदार्थांची रस्त्यावरच विक्री

देसाईगंज : गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे.

एटापल्लीतील सौरदिवे नादुरुस्त

एटापल्ली : अतिदुर्गम भागांत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले; परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत. या योजनेवर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे; मात्र सदर खर्च वाया गेला आहे.

मालेवाडा भागातील समस्या सोडवा

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.

कोत्तागुडम पुलाचे बांधकाम करा

अहेरी : व्यंकटापूर-अहेरी राज्य महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या कोत्तागुडम पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आवागमन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या बांधकामात खंड पडला आहे. व्यंकटापूर परिसरातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने या पुलाचे बांधकाम करावे.

Web Title: Check road quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.