१ जुलैपासून सीबीएसई शाळांत नववीसाठी तीन भाषा अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 07:51 IST2026-05-17T07:51:09+5:302026-05-17T07:51:24+5:30
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व अभ्यासक्रम आराखडा २०२३च्या उद्दिष्टांनुसार नववीच्या नव्या अभ्यासक्रमाचा सीबीएसईने आढावा घेतला.

१ जुलैपासून सीबीएसई शाळांत नववीसाठी तीन भाषा अनिवार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात येणार आहे. हा बदल टप्प्या टप्प्याने होणार असल्याचे ‘सीबीएसई’ने म्हटले आहे. मात्र या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी अपेक्षित भाषिक कौशल्य गाठले नाही तर दहावीच्या बोर्ड परीक्षेला विद्यार्थ्यांना रोखले जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णयदेखील घेण्यात आला आहे.
हा निर्णय १ जुलै पासून लागू होणार असून, विद्यार्थ्यांना किमान दोन भारतीय भाषा शिकणे बंधनकारक असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व अभ्यासक्रम आराखडा २०२३च्या उद्दिष्टांनुसार नववीच्या नव्या अभ्यासक्रमाचा सीबीएसईने आढावा घेतला. त्यावेळी विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य गाठण्यास वेळ लागू शकतो, असे स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून...
चालू शैक्षणिक वर्षानंतर बदल लागू होत असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये म्हणून ‘सीबीएसई’ने संक्रमणकालीन पद्धत स्वीकारली असून शाळा व विद्यार्थी नव्या अभ्यासक्रमाशी टप्प्याटप्प्याने जुळवून घेतील, असे स्पष्ट केले आहे.
आर १, आर २ आणि आर ३ अशा पद्धतीने भाषांचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. सीबीएसईने मुख्याध्यापकांना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील अध्ययन निष्पत्ती आणि भाषिक उद्दिष्टे समजून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
माध्यमिक व मध्यम स्तरातील भाषिक कौशल्यांमध्ये सुमारे ७५ ते ८० टक्के साम्य असल्याचे स्पष्ट झाले. आर-३ भाषेची स्वतंत्र पुस्तके उपलब्ध होईपर्यंत नववीच्या विद्यार्थ्यांनी सहावीची भाषा पुस्तके वापरावीत. भाषिक विकासासाठी स्थानिक साहित्याचा विविधतेने पूरक वापर करावा.
सहावीची पुस्तके १५ जूनपासून उपलब्ध
पूरक साहित्याची निवड आणि अध्यापन पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. सहावीची पुस्तके सर्व संलग्न शाळांना दि. १५ जूनपासून उपलब्ध केल्या जातील, असे सीबीएसईच्या शैक्षणिक विभागाच्या संचालक प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा सिंग यांनी सांगितले.