शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: हरयाणा दंगलीचे दुष्टचक्र, त्यात निवडणुका तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 11:10 IST

लगतच्या राजस्थानात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे, तर पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

देशाची राजधानी दिल्लीपासून दक्षिणेला जेमतेम ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हरयाणातील जिल्हा मुख्यालयात एका यात्रेदरम्यान धार्मिक दंगल उसळते. घरेदारे, दुकानांची तोडफोड, जाळपोळ होते. थरकाप उडावा असा जळालेल्या गाड्यांचा रस्त्यावर खच पडतो. सहा जणांचा बळी जातो. त्यात दंगल काबूत आणण्यासाठी पोलिसांना मदत करणारे गृहरक्षक दलाचे दोन जवान असतात. कित्येक पोलिस जखमी होतात. आणि अशा धार्मिक दंगलीबद्दल कसलीही खंत न बाळगणारे, अपराधीपणाची कोणतीही भावना नसलेले जोरदार राजकारण सुरू होते. थोडक्यात, निवडणूक जवळ आलेली असते. लगतच्या राजस्थानात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे, तर पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आधीच मणिपूरच्या रूपाने देशाच्या ईशान्य भागातील एका सीमावर्ती राज्याचे हिंसाचारात होत्याचे नव्हते होत असताना नूंह दंगलीच्या रूपाने हरयाणा पेटावे, हा योगायोग अजिबात नाही. राजकारणासाठी दोन धर्मामध्ये निर्माण केले जाणारे वितुष्ट, एकमेकांचे जीव घेण्याइतपत पसरलेला विद्वेष या सगळ्यांचे हे भयंकर परिणाम आहेत. नूह येथील दंगलीला मोनू मानेसर नावाच्या बजरंग दलातील बहुचर्चित गोरक्षकाच्या व्हिडीओचे निर्मित झाले.

गेल्या फेब्रुवारीत जुनेद व नासीर नावाच्या राजस्थानातील दोन तरुणांना गो तस्करीच्या संशयावरून त्यांच्या गाडीसह भिवानी येथे जाळण्यात आले. त्या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये मोनूचे नाव आहे. तो तेव्हापासून फरार आहे. गेल्या आठवड्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेत आपण सहभागी होणार असल्याचा फरार मोनूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये संतापाची लाट उसळली. प्रत्यक्ष मोनू यात्रेत आला की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या यात्रेचेदेखील अवघे तिसरे वर्ष आहे. मुस्लीमबहुल मेवात प्रांतातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यासाठी ही यात्रा सुरू झाली. पाच-सहा जिल्हाांमधील लोक तिच्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. गेल्या सोमवारी नूंह येथे दंगल उसळली तेव्हा यात्रेत पंचवीस हजारांच्या आसपास भाविक होते. तिथल्या नल्हड महादेव मंदिर परिसरात यात्रेवर सुनियोजितपणे हल्ला झाला.

हजारो भाविक मंदिर परिसरात अडकले. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला अरवली पर्वतरांगेतल्या टेकड्या आहेत. दंगेखोरांनी डोंगरावर जंगलात आश्रय घेतला व तिथून यात्रेवर दगडफेक केली, गोळ्या चालवल्या असा आरोप आहे. प्रत्युत्तरात पोलिसांच्या उपस्थितीत मंदिरातून काहींनी दंगेखोरांवर आधुनिक बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यानंतर हे दंगलीचे लोण नूंहपासून पन्नास किलोमीटर आणि दिल्लीला लागुन असलेल्या महत्त्वाचे आर्थिक केंद्र गुरुग्रामपर्यंत पसरले. नूहमधील यात्रेवरील हल्ल्याचा बदला म्हणून गुरुग्राममधील एक मशीद पेटवून देण्यात आली आणि त्यात मौलाना मोहम्मद साद नावाचा अवघ्या १९ वर्षे वयाचा त्या मशिदीचा नायब इमाम जळून खाक झाला. या साद यांनी गायिलेल्या, जालीम हूं इन्सान बना दे या अल्ला, घर की मेरे दिवार हटा दे या बल्ला, हिंदू-मुस्लीम बैठ के खाये थाली में, ऐसा हिंदुस्थान बना दे या वल्ला' या गाण्याचा व्हिडीओ व सोबत त्याच्या हत्येची बातमी ही या घटनाक्रमातील सर्वाधिक वेदनादायी गोष्ट म्हणावी लागेल. हिंसक जमावाने एका बाजूला असा बदला घेतला तर हरयाणातील मनोहर लाल खट्टर सरकारने दंगल घडविणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी बुलडोझर संस्कृतीचा आधार घेतला आहे. ज्या नल्हड शिवमंदिर परिसरात ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर हल्ला झाला, त्या भागात वनजमिनींवरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले तीन-चार दिवस सरकारी बुलडोझर दुकाने, घरे भुईसपाट करीत आहे. या कारवाईचा दंगलीशी संबंध नाही, असे सांगण्याचा शहाजोगपणा हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दाखवला आहे. याचाच अर्थ दंगलीचे निमित्त करून वर्षभरावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

एकमेकांच्या जिवावर उठलेल्या समुदायांमध्ये धार्मिक सद्भाव तयार व्हावा म्हणून प्रयत्न करण्याऐवजी ही अशी पावले उचलल्यामुळे धार्मिक विद्वेषाचे दुष्टचक्र संपणारच नाही. दंगलीचे व्रण मिटणार नाहीत. जखमा ओल्याच राहतील. वेदनांची ठसठस सतत जाणवत राहील. कदाचित त्यातूनच पुढच्या दंगलीची बीजे रोवली जातील. हेच आपल्या देशाचे प्राक्तन आहे. गठ्ठा मतांवर डोळा ठेवून कुणी अल्पसंख्यांकांचे तर कुणी बहुसंख्याकांचे लांगूलचालन करायचे. त्यासाठी परस्परांमध्ये द्वेष पसरवत राहायचा. सतत दंगलींना चिथावणी देणारी भाषा वापरायची. धर्माच्या नावावर तरुणांची माथी भडकवायची आणि दोन समाज असे एकमेकांवर चालून गेले, निरपराधांचे बळी गेले, की मतांचे पीक कापायचे, हे राजकारण गेली पाऊणशे वर्षे देशात सुरू आहे. हरयाणातील आताची दंगल हा त्याच विद्वेषी परंपरेचा भाग आहे. दंगल कुणी सुरू केली किंवा तिच्या आगीत कुणाची होरपळ अधिक झाली हा किरकोळ तपशिलाचा भाग आहे. मूळ मुद्दा दंगलीत होणारी जीवित व वित्तहानीचा आहे. दुर्दैवाने त्यावर फारशी चर्चा होत नाही.

टॅग्स :Haryanaहरयाणा