१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
By यदू जोशी | Updated: May 1, 2026 06:48 IST2026-05-01T06:47:55+5:302026-05-01T06:48:32+5:30
हल्ली अनेकांना पायऱ्या चढायच्या नसतात, त्यांना लिफ्ट हवी असते. भाजपने मात्र पक्षासाठी वर्षानुवर्षे पायपीट केलेल्यांचा सन्मान केला आहे!

१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
यदु जोशी, राजकीय संपादक,
लोकमत
विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरायला भाजपचे सुनील कर्जतकर आले होते, ते जरा झुकून चालतात, त्यांच्या नम्रतेने त्यांना झुकवले आहे. विधानभवनच्या दहा पायऱ्या चढून आमदारकीचा अर्ज भरायला ते गेले त्यामागे ४० वर्षे पक्षासाठी केलेले कष्ट आहेत. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची खडान्खडा माहिती असलेले जे पाचजण आहेत, त्यात कर्जतकर एक आहेत. पक्षाने सांगितले तसे ते चालत राहिले, गावोगावी एसटीने तर कधी दुचाकीने उन्हातान्हात फिरले.
नागपूरचे संजय भेंडे ३५ वर्षांहून अधिक काळ भाजपचे काम करताहेत. आधीही आमदारकीसाठी त्यांचे नाव चर्चेत आले, पण जमले नाही. त्यांनीही आरडाओरड केली नाही. माधवी नाईक, प्रमोद जठारदेखील तसेच. चौघेही पक्षनिष्ठेबाबत २४ कॅरेट. निष्ठेचे फळ एक ना एक दिवस मिळते याचे हे ठसठशीत उदाहरण. निष्ठा बरेचदा त्वरित फळ देत नाही, पण वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करते. लोकांना या चौघांनी चढलेल्या विधान परिषदेच्या पायऱ्या दिसल्या; पण त्या आधी केलेली शेकडो किलोमीटरची पायपीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीला दिसली म्हणून ते आमदार होत आहेत.
आजकाल अनेकांना पायऱ्या चढायचा, पायपीट करायचा कंटाळा येतो, त्यांना लिफ्ट हवी असते. विनाकष्टाने सहज काही मिळण्याची अपेक्षा असलेल्यांची पक्षात गर्दी होत असताना आपली हयात पक्षासाठी दिलेल्या जुन्याजाणत्यांना संधी देऊन फडणवीसांसह दिल्लीतील नेतृत्वानेही एक मेसेज दिला आहे. लिफ्टने वर गेलेल्यांना मजले आठवत नाहीत, पायऱ्यांनी चढलेल्यांना प्रत्येक पायरीची कथा सांगता येते. निष्ठा ही आंधळी असते बरेचदा, पुढे काय मिळणार हे दिसत नसतानाही ती चालत राहते. पक्षाकडून जगण्याची सोय बघणारे अनेक असतात; पण पक्षासाठी जगणाऱ्यांचे मोल होणे महत्त्वाचे असते; ते यावेळी झाले आहे. संघर्ष वाया जात नाही, तो संधीच्या रूपाने असा परत येतो. उमेदवारीत भाजपने क्षेत्रीय, सामाजिक संतुलनही साधले.
यांनाच संधी का दिली?
सुनील कर्जतकर यांना संधी दिल्याची प्रतिक्रिया अशी आहे की, ज्यांना कधीच काही मिळाले नाही त्यांना मिळाले. कर्जतकर ब्राह्मण; त्यांना उमेदवारी दिल्याने दुसरे ब्राह्मण विदर्भाचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर आणि तिसरे ब्राह्मण पुण्याचे राजेश पांडे राहून गेले. एकच्या वर ब्राह्मण देता येणार नाही असा दिल्लीचा निरोप होता म्हणतात. नागपूर-विदर्भात एक आमदारकी दिलीच पाहिजे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते अन् संजय भेंडेंचे नाव पुढे आले. कोठेकर यांचे तिकीट ‘आरएसी’पर्यंत आले होते, पण ते कन्फर्म न होता, वेटिंगवर असलेल्या भेंडेंचे तिकीट कन्फर्म झाले. कर्जतकर आणि राजेश पांडे असा टाय आला होता; पण मुंबईतील भाजपचे नेते कर्जतकरांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले, एका अर्थाने हा मुंबईने केलेला पुण्याचा पराभव आहे.
विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या दोघांमध्ये एक समानता आहे. त्यांच्या जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांना एक मेसेज दिला गेला की तुम्हाला महत्त्व दिले असले तरी पक्षातील जुन्याजाणत्यांचे आणि प्रभावी नेत्यांचे बोट सोडले जाणार नाही. सिंधुदुर्गातील भाजप म्हणजे राणे असे चित्र असताना जठारांना आमदारकी दिली. तसेच कोपरगावमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हे परिवाराने संयम दाखवला आणि ज्यांच्याशी अनेक वर्षांचा संघर्ष आहे अशा काळेंच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. चार महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत कोल्हेंनी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला, ते तर आहेच शिवाय कोल्हे शिक्षण आणि सहकारातील दिग्गज नाव आहे. विखेंचे महत्त्व कायम ठेवत त्यांचे अंतर्गत विरोधक असलेले कोल्हे यांनाही महत्त्व दिलेच जाईल, असे विवेक यांना आमदारकी देऊन भाजप नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. स्नेहलताताईंनी आमदारकीला थांबावे लागले, तेव्हा फडणवीस यांनी दिलेला शब्द विवेक यांना आमदारकी देऊन पाळला. फडणवीसांच्या टीममध्ये एक चांगली भर पडली आहे.
४० वर्षांच्या निष्ठेची कदर झाली अन् पक्षांतर करणाऱ्यालाही (बच्चू कडू) झटपट उमेदवारी मिळाली. संयमी, अभ्यासू अशा डॉ. नीलम गोऱ्हे यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी दिली. मातोश्रीची साथ सोडून त्या शिंदेंसोबत गेल्या, शिंदेंनी त्यांना रिटर्न गिफ्ट दिले. ‘झेंडा बदलला, पण अजेंडा तोच आहे’ हे वाक्य इम्प्रेशन मारायला ठीक आहे, पण आमदारकीसाठी शिंदेसेनेत प्रवेश घेऊन बच्चूभाऊंनी स्वत:ची धार स्वत:च बोथट करून घेतली आहे. त्यांच्या रूपाने शिंदेंनी भाजपचा एक विरोधक जवळ केला आहे.
yadu.joshi@lokmat.com