ताई.. बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान !

By सचिन जवळकोटे | Published: August 25, 2019 08:39 AM2019-08-25T08:39:19+5:302019-08-25T08:40:39+5:30

लगाव बत्ती..

Tai .. Now you are the captain of the sinking ship! | ताई.. बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान !

ताई.. बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान !

Next

- सचिन जवळकोटे


प्रिय ताई...
रक्षाबंधन होऊन दोन आठवडे होत आले. आता पुन्हा तुमची आठवण आम्हा पामराला यावी, असं नक्कीच काही तरी घडलं असावं. त्यात पुन्हा तुम्ही एकट्या नव्हे तर दोघी ताई. एक बारामतीच्या सुकन्या. दुसºया सोलापूरच्या राजकन्या. लहानपणापासून थाटामाटात वाढलेल्या. आता राजकारणात आल्यानंतर साध्या सिंपल राहू लागलेल्या, हा भाग वेगळा.

   असो. ताईऽऽ तुमची आठवण येण्याचं कारण म्हणजे करमाळ््याच्या ‘दीदीं’नी ‘भगवं बंधन’ बांधलं. लोकसभेला ज्यांनी ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्यावर विश्वास ठेवून दुश्मनाचा प्रचार केला, त्याच ‘दीदीं’नी विधानसभेला पक्षावर अकस्मातपणे अविश्वास दाखविला. खरंतर, राजकारणात सतत रंग बदलण्याचं पेटंट म्हणे ‘संजयमामां’नी घेतलेलं; मात्र या ‘दीदीं’नी तर केवळ त्यांचं पेटंटच तर नव्हे, तर त्यांच्या हाती येऊ पाहणारं ‘धनुष्यबाण’ही हिरावून घेतलं. तिकडं सांगोल्याचे ‘दीपकआबा’ही म्हणे रात्री-अपरात्री ‘कमळऽ कमळऽऽ’ म्हणत झोपेतून दचकून जागे होताहेत. खरंतर, त्यांचं काम गेल्या महिन्यातच झालं असतं; परंतु पूर्वी एकदा त्यांनी सहज ‘निष्क्रिय पालकमंत्री’ म्हणून ‘विजूमालकां’ची हेटाळणी केलेली. त्याचा फटका आता बसू लागलाय त्यांना. ‘इनकमिंग’च्या गठ्ठ्यात त्यांच्या अर्जाची फाईल एकदम खाली ठेवली गेलीय मुद्दामहून. बार्शीचे ‘दिलीपराव’ही ‘भगवा झेंडा’ घेऊन एका पायावर तयार. ‘बबनदादां’चंही अद्याप ‘तळ्यात-मळ्यात’च चाललंय. म्हणजे ‘कमळाच्या तळ्यात की बाणाच्या मळ्यात?’
  
   इकडं अक्कलकोटचे ‘सिद्धूअण्णा’ ग्रामीण भागात दौरे करताना ‘नमस्कार रीऽऽ’ म्हणतच नाहीत. थेट ‘जय श्रीरामऽऽ’चा नमस्कार ठोकताहेत. शिवदारेंच्या ‘राजूअण्णां’नीही म्हणे ‘कमळ फुल’ डिझाईन असलेला ड्रेस ‘सिद्धूअण्णां’सोबत शिवायला टाकलाय. पंढरपूरचे ‘भालकेनाना’ही विठुनामाचा गजर करता करता ‘नरेंद्र-देवेंद्र’चाही जयघोष करू लागलेत. कुमठ्याचे ‘दिलीप मालक’ तर आत्तापासूनच ‘आॅरेंज कलरचा शर्ट’ घालून ‘मध्य’ मतदारसंघातल्या बँकेत बसू लागलेत. हे सारं वारंवार आठवून देण्याची गरज निर्माण झालीय.. कारण अक्कलकोट, दक्षिण, बार्शी, सांगोला, पंढरपूर, माढा, करमाळा अन् माळशिरस तालुक्यात ‘हातात घड्याळ’ घेऊन उभारायला शिल्लक आहेच कोण? असा भाबडा प्रश्न आम्हा पामराला पडलाय.

प्रणितीताई..
पिताश्रींच्या सलग दोन पराभवांनंतरही मोठ्या हिरिरीने रणांगणात उतरण्याची तुमची जिद्द खरंच ग्रेट. ‘थेट लोकांशी संपर्क’ ठेवण्याची तुमची हातोटीही वाखाणण्याजोगी; मात्र हीच तुमची स्टाईल जवळच्या कार्यकर्त्यांनाही खटकू लागलीय, त्याचं काय? आजपावेतो तुमचे पिताश्री अन् सर्वसामान्य सोलापूरकर यांच्यातला दुवा म्हणजे हेच कार्यकर्ते होते. पिताश्री दिल्ली-मुंबईत. सोलापूरचे कर्तेकरवितेच बनलेले कार्यकर्ते महापालिकेत. आता ती परंपरा मोडीत काढण्याचं काम तुम्ही मोठ्या हिकमतीनं करताय. ‘मेंबर’ मंडळींना बाजूला सारून थेट त्यांच्या वॉर्डात फिरताय. याला कुणी ‘सूडबुद्धीचं राजकारण’ म्हणतंय, तर कुणी ‘डॉमिनेटिंग अ‍ॅटीट्यूड’. खरंतर तुमचे पिताश्री समोरच्या कट्टर दुश्मनाशीही बोलतात गोड. मनातले भाव चेह-यावर येऊ न देता पद्धतशीरपणे समोरच्याला लावतात वाटेला. राजकारणात यशस्वी होण्यासाठी लागणारी ‘डिप्लोमॅटीक स्ट्रॅटेजी’ तुम्हीही जास्तीत जास्त आत्मसात करावी, ही निष्ठावान कार्यकर्त्यांची इच्छा... एकेक करत सोडून चाललेल्या रिकाम्या पक्षाला केवळ तुम्हीच वाचवू शकता जिल्ह्यात... कारण ताई... बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान !

पाठीत खंजीर’ खुपसण्याची विश्वासघातकी परंपरा..

सुप्रियाताई... तुमचे पिताश्री म्हणजे लोकांसाठी ‘चमत्कारी बाबा’. आजपावेतो ते जे-जे ठरवत आले, अगदी तस्संच घडत आलेलं; मात्र गेल्या पाच वर्षांपासून ‘चमत्कार’ तर सोडाच ‘नमस्कार’ही कमी झालेले. त्यांच्याजवळचे अत्यंत निष्ठावान सहकारी एकेक करत दूर गेलेले. ‘सत्तेशिवाय आपण जगू शकत नाही’ हे अनेकांनी सिद्ध करून दाखविलेलं. खरंतर ‘घड्याळवाल्यांचा पक्ष म्हणजे केवळ सत्तेसाठी उदयास आलेली टोळी’ अशी घणाघाती टीका पूर्वी विरोधकांनी अनेकवेळा केलेली. त्यावेळी लोकांना हे पटायचं नाही. मात्र आता बुडत्या जहाजातून ज्या पद्धतीनं पटापटाऽऽ उड्या मारण्याचा वेग वाढत चाललाय, ते पाहता अनेकांना त्या टीकेचा प्रत्यय येऊ लागलाय.
  
   ताई... तुम्ही सोलापुरात डॉक्टरांशी अन् विद्यार्थ्यांशी संवाद साधलात. खरंतर, गेल्या अनेक दशकांपासून ‘बारामतीच्या काकां’ना साथ देणारे विश्वासू नेते अकस्मातपणे असं का बदलू लागलेत, या मानसिकतेचा शोध घ्या म्हणावं तमाम डॉक्टरांना. ‘पाठीत खंजीर’ खुपसण्याची विश्वासघातकी  परंपरा शिष्यांनी पुढं चालवायलाच हवीय का?, याचंही उत्तर शोधा म्हणावं तमाम विद्यार्थ्यांना. असो. तुम्ही खूप वर्षांनी एवढा निवांत वेळ काढून आलात सोलापुरात. संवाद साधलात जनतेत. खरंतर, हे पूर्वीपासूनच केलं असतं तर ‘मनोहरपंत   अन् संतोषभाऊ’ सारखे कट्टर सोलापुरी कार्यकर्ते तयार झाले असते गावोगावी. अजूनही वेळ नसावी गेलेली. येत राहा अधून-मधून सोलापुरात.. कारण ताई..  बुडत्या जहाजाच्या आता तुम्हीच कप्तान !

Web Title: Tai .. Now you are the captain of the sinking ship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.