इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 06:26 IST2026-05-12T06:24:41+5:302026-05-12T06:26:04+5:30
Dombivli Youth Dies During Trek: ट्रेकिंगसाठी मित्रांसोबत आलेल्या डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका या युवकाचा अचानक मृत्यू झाला.

इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
मोहपाडा : सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या इर्शाळवाडी ट्रेकने सोमवारी एका तरुणाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. ट्रेकिंगसाठी मित्रांसोबत आलेल्या डोंबिवलीतील २० वर्षीय रितेश कोणका या युवकाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. उष्माघात अथवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध इर्शाळवाडी येथे डोंबिवलीतील सहा मित्रांचा समूह सोमवारी ट्रेकिंगसाठी आला होता. साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेट्टी आणि रितेश कोणका हे सर्व मित्र ट्रेक करत असताना अचानक रितेशला अस्वस्थ वाटू लागले.
मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच तो बेशुद्ध पडला. घटनेनंतर दोन युवक तातडीने पायथ्याशी धावत आले आणि ग्रामस्थांना माहिती दिली.
त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. खालापूर पोलिस ठाणे आणि स्थानिक यंत्रणेलाही याची माहिती देण्यात आली.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
डोंगराळ आणि कठीण मार्गामुळे ग्रामस्थांनी पारंपरिक झोळीच्या साहाय्याने रितेशला खाली आणले.
पायथ्याशी आधीच अॅम्ब्युलन्स तयार ठेवली होती. त्याला चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
रितेश कोणका हा कोपर परिसरातील रहिवासी असून, तो एसआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चौक आउटपोस्टचे प्रभारी पीएसआय विशाल पवार यांच्या समन्वयातून पुढील कार्यवाही सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
'वाढत्या उष्णतेमुळे खबरदारी घ्यावा...'
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवकांनी पुरेसे पाणी, वैद्यकीय खबरदारी आणि शारीरिक क्षमतेनुसार नियोजन करणे आवश्यक असल्याची भावना तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.