शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:17 IST

माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे गरजले होते की, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जेथे एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना पीकविमा देतो. पण, आता एका झटक्यात ही योजना गुंडाळली. पीकविमा योजनेत करोडो रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांनी विधिमंडळात केला. आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात ‘परळी पॅटर्न’चे पुरावेच मांडले.

कधी पाऊस न पडल्याने पिके होत नाहीत, कधी पेरणीचा वाफ बरोबर न साधल्याने पिकाला धक्का बसतो, कधी बियाणे नीट न निघाल्याने पेर वाया जातो, अशा सुलतानी व अस्मानी संकटांनी पीक न झाल्यास शेतकरी आपली हकीकत कळविण्यासाठी सरकारी कामगाराच्या घरी जातो. तेव्हा अगरबत्तीच्या सुवासात लपेटून देवपूजेत व पोथीत दंग असलेला हा कामगार शेतकऱ्याला विचारतो, ‘तू कोण आहेस?’. शेतकरी उत्तरतो, ‘रावसाहेब, मी शेतकरी’. त्यावर सरकारी रावसाहेब म्हणतो, ‘देवपूजेत तुझे काय काम आहे? काही भाजीपाला आणला असेल तर घरात ठेव आणि दुपारी कचेरीत येऊन तुझ्या नावाचा लेखी अर्ज कर, म्हणजे तुझे म्हणणे साहेबास सांगेन’... शेतकरी साहेबापुढे कैफियतीसाठी उभा राहतो. तेव्हा गोरा कलेक्टर मुखातून शुद्ध सोनेरी वाक्य उच्चारतो, ‘टुमची टकरार टरकटी आहे’. १८८३ साली महात्मा फुलेंनी शेतकऱ्याची ही कैफियत या उदाहरणासह ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथांत मांडली. ‘एक रुपयात पीकविमा’ या योजनेतही सरकारने शेतकऱ्यांना असेच वाटे लावले आहे. गुंडाळले आहे. ‘एक रुपयात आम्ही शेतकऱ्याला पीकविमा दिला’ याची केवढी जाहिरातबाजी झाली. माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे गरजले होते की, महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे जेथे एक रुपयात आम्ही शेतकऱ्यांना पीकविमा देतो. पण, आता एका झटक्यात ही योजना गुंडाळली. पीकविमा योजनेत करोडो रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्याच नेत्यांनी विधिमंडळात केला. आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात ‘परळी पॅटर्न’चे पुरावेच मांडले. शेतकरी बीड जिल्ह्यातील अन् त्यांच्या नावे विमा उतरवला गेला धाराशिव जिल्ह्यात. महसूल दर्जा नसलेल्या गावात पीकविमा दिसतो. बिगरशेती, गायरान जमिनींवर पीकविमा उतरवला गेला. मुख्यमंत्र्यांसह सरकारनेच मान्य केले की, या योजनेत घोटाळा झाला. म्हणून राज्य मंत्रिमंडळाने योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला. घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले. नाहीतर ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ हीच पोथी सत्ताधाऱ्यांकडून वाचली जात होती. या घोटाळ्याचा चौकशी अहवाल येणार आहे. त्यानंतर नेमका किती रकमेचा घोटाळा झाला, तो कुणी केला हे समोर येईल. पण, योजना बंद केल्याने महाराष्ट्र सरकार फायद्यात राहणार आहे. यात भुर्दंड पडेल तो शेतकऱ्यांना.

सुधारित ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू झाली २०१६ साली. त्यात केंद्र व राज्य सरकारचा वाटा होता. पण शेतकऱ्यांनाही विमा हप्ता भरावा लागत होता. २०२३ नंतर एक रुपयात पीकविमा राज्यात आला. यात शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयात विमा काढायचा. शेतकऱ्यांच्या वाट्याचा उर्वरित हप्ता राज्य सरकार भरत होते. ही योजना नसताना रब्बी हंगामात सन २०२२-२३ मध्ये सरकारला द्यावे लागलेले अनुदान होते १२२ कोटी रुपये. मात्र, एक रुपयाची योजना आल्यानंतर हे अनुदान १ हजार २६५ कोटींवर गेले. खरीप हंगामात हा आकडा १८०० कोटींवरून ४७०० कोटींवर गेला. म्हणजे सरकारचा खर्च वाढला. आता योजना बंद केल्याने शेतकऱ्यांना आपला विमा हप्ता स्वत: भरावा लागेल. पर्यायाने सरकारचे पैसे वाचतील. घोटाळ्याचे कारण देत सरकारने योजनेतून पद्धतशीर अंग काढले आहे. ‘टकरार टरकटी ठरवली’. सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोठे कोठे पैसा शोधू, या विवंचनेत सरकार आहे.

आदिवासी व सामाजिक न्याय विभागांचा पैसाही लाडक्या बहिणींकडे वळवला. त्यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट संतापले आहेत. ते म्हणाले, ‘आवश्यकता नसेल तर खातेच बंद करा’. आता शेतकरी भावांवर खर्च होणारा पीक विम्याचा पैसाही कदाचित लाडक्या बहिणींकडेच जाईल. यंदा योजनेचे निकषही बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा हप्ता सरकार भरणार नाहीच. पण स्वत:च्या वाट्याचा जो पूर्वीचा हप्ता होता तो देखील योजनेचे निकष बदलून कमी केला जाईल. एखादी योजना गुंडाळावी लागली तर सरकारला वाईट वाटते. पण, ही योजना बंद करताना सरकारला हर्ष होत असणार. शिक्षा घोटाळेबाजांना नव्हे, शेतकऱ्यांना दिली गेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाfraudधोकेबाजी