एक करंजी भुकेल्यांसाठी !

By किरण अग्रवाल | Published: October 19, 2017 08:01 AM2017-10-19T08:01:45+5:302017-10-19T08:02:37+5:30

दिवाळीच्या दीपोत्सवाने अवघा आसमंत उजळून निघाला आहे. अंधकाराला दूर सारणाऱ्या प्रकाशाचाच हा उत्सव असल्याने सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे मंगलमयी वातावरण आहे.

A charcoal for hunger! | एक करंजी भुकेल्यांसाठी !

एक करंजी भुकेल्यांसाठी !

Next

दिवाळीच्या दीपोत्सवाने अवघा आसमंत उजळून निघाला आहे. अंधकाराला दूर सारणाऱ्या प्रकाशाचाच हा उत्सव असल्याने सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे मंगलमयी वातावरण आहे. हा उत्साह वा आनंद आपल्यासमवेत इतरांच्याही चेहऱ्यावर पाहण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था-संघटना हल्ली धडपडताना दिसत आहेत. सामाजिक भान टिकून असल्याचा व ते जपण्यासाठी अनेक हात पुढे सरसावताना दिसण्याचा आशादायी प्रत्यय यातून येत असून, तोच खरा निराशेची काजळी दूर सारणाराही आहे; पण हा आनंद वा उत्साह प्रासंगिक दिवाळीच्या सणापुरता न राहता या मागील भावना बारमाही स्वरूपात कशी टिकू शकेल याचा विचार होण्याची गरज आहे. विशेषत: दिवाळीच्या निमित्ताने एकीकडे गोडधोड फराळाचे ‘शेअरिंग’होत असताना दुसरीकडे भुकेच्या समस्येत आपला देश चक्क शंभराव्या स्थानी आल्याची वार्ता पाहता, भूकमुक्त भारत साकारण्यासाठी प्रयत्न होण्याची निकड अधोरेखित व्हावी.

यंदा तसा पाऊस समाधानकारक झाला. अलीकडच्या काही दिवसात काही ठिकाणी परतीच्या पावसाने नुकसान घडवून आणले; पण त्याखेरीज पावसाने बऱ्यापैकी हात दिला. सर्वच ठिकाणची धरणो त्यामुळे ओसंडून वाहिली. गेल्यावर्षीच्या नोटाबंदीच्या तडाख्यातून जनता अजून पुरेशी सावरलेली नसताना ‘जीएसटी’नेही त्यात भर घातली. त्यातच कर्जबारीपणामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या घडून आल्या. त्यामुळे काहीसे नैराश्याचे व चिंतेचे वातावरण होते. पण ऋण काढून सण साजरा करण्याची भारतीय मानसिकता असल्याने दिवाळीच्या निमित्ताने बाजारात तेजी आल्याचे दिसून आले. अडीअडचणी व चिंतांना दूर सारत प्रत्येकजण आपापल्या परीने आशेचे दीप लावताना दिसून येत असून, सारे वातावरण चैतन्याने भारले आहे. दीपोत्सवाचे हेच तर विशेष असते की, अवघा समाज या चैतन्यपर्वाच्या आनंदात न्हाऊन निघतो. विशेष म्हणजे, हा आनंद वा उत्सव व्यक्तिगत आपल्यापुरता किंवा आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता तो इष्टमित्रांसमवेतच वंचितांबरोबर साजरा करण्याची भावना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुके आदिवासीबहुल आहेत. सरकार या क्षेत्रासाठी अनेकविध विकास योजना आखत असते; पण त्या पूर्णाशाने आदिवासी घटकांपर्यंत पोहचत नसतात. त्यामुळे हा घटक अजूनही विकासापासून वंचितच असल्याचे दिसून येते. या वंचितांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना आदिवासी वाडय़ापाडय़ांवर धाव घेत असतात. काही वर्षापूर्वी ‘एक करंजी मोलाची’असे उपक्रम राबविले जात असत. याबाबतीत नाशिक जिल्ह्यातील येवला येथील धडपड मंचचे नाव आवर्जून घ्यायला हवे. या मंचचे सदस्य प्रतिवर्षी असा उपक्रम राबवून वंचितांसोबत दिवाळी साजरी करत असतात. त्याचप्रमाणो गेल्या काही वर्षापासून अनेक संस्थाही यासाठी पुढे सरसावलेल्या दिसत आहेत. यंदा नाशकातील आकार फाउण्डेशन, सोशल नेटवर्किग फोरम, युवा अस्तित्व फाउण्डेशन, यश फाउण्डेशन, अवेकनिंग जागृती संस्था, स्पार्टन हेल्प सेंटर, मानवधन, माणुसकी व सावली बहुउद्देशीय संस्था, पूर्वाचल विकास समिती, वात्सल्य संस्था, हास्ययोग क्लब यांसारख्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱयांनी व सदस्यांनी आदिवासी वाडय़ापाडय़ांवर जाऊन दिवाळी साजरी केली. सामाजिक समतेचा, कर्तव्याचा व उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ यातून घडून येत आहे. पण सणावाराच्या निमित्ताने हे जे घडून येते ते कायम दिसून येत नाही. या वंचित घटकाचे दिवाळीचे दोन पाच दिवस आनंदात जात असले तरी, त्यांचा उर्वरित काळ परिस्थितीशी झगडण्यातच जातो. यातून आदिवासी बालकांच्या कुपोषणासह त्यांचे व मातामृत्यूंचे प्रमाणही वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्थथेने आपला जो अहवाल जारी केला आहे त्यात भारतातील भुकेची समस्या आपल्यापेक्षा लहान व गरीब असलेल्या शेजारील देशांपेक्षा गंभीर असल्याचे नोंदविले आहे. अगदी नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, इराक व उत्तर कोरियापेक्षाही आपल्याकडील भुकेची समस्या गंभीर आहे. ११९ विकसनशील देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक तब्बल शंभरावा आहे, यावरून ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज बांधता यावा. आपल्याकडे मुलांमधील कुपोषणाची समस्या मोठी असून, त्यामुळेच या यादीत भारताचे स्थान खूप खाली घसरले आहे. भारतात पाच वर्षाच्या आतील एकपंचमांश मुलांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत कमी असते, हा कुपोषणाचा परिणाम असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१४ मध्ये भारताचा क्रमांक या यादीत ५५ वा होता, तर गेल्या वर्षी ९७ वा होता. यंदा त्याहूनही खाली घसरण झाली आहे. ही बाब केवळ चिंतादायक नसून संवेदनशील मनाला चिंतन करावयास लावणारीदेखील आहे. आपल्या सामाजिक संस्था, संघटना दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी पाडय़ांवर जाऊन त्यांचे काही दिवस गोड जरूर करून देतात; परंतु त्याने परिस्थिती सुधारणारी नाही. कुपोषणासारखे प्रकार टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी यंत्रणांच्या झारीतील शुक्राचार्यामुळे त्यात पुरेसे यश येत नाही. यासंदर्भात सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन ग्रामीण व आदिवासी भागातील सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सजग राहणे अपेक्षित आहे.

भूकमुक्ती हा तसा गंभीर विषय आहे. एकीकडे समाजात आपले मोठेपण मिरवण्यासाठी लग्नांमध्ये अनेकविध जिन्नसांचा समावेश असलेल्या मोठमोठय़ा पंगती उठत असताना व मोठय़ा प्रमाणात अन्नाची नासाडीही होत असताना दुसरीकडे दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेला वर्गही आपल्याकडे आहे. पण त्याबाबत कोणालाच काही वाटत नसल्याचे चित्र आहे. लग्न-समारंभानिमित्त होणाऱ्या अन्नाच्या या नासाडीबद्दल ‘उतनाही लो थाली में, व्यर्थ ना जाये नाली में’ अशी जाणीव जागृती करणारी मोहीम हाती घेण्याची वेळ अनेक ज्ञाती संस्थांवर आली आहे, त्याचा बऱ्यापैकी परिणामही होताना दिसत आहे. पण तरीही भुकेला घटक भुकेपासून मुक्त होऊ शकलेला नाही. सामाजिक समतेचा उच्चार अनेकांकडून अनेक ठिकाणीी केला जातो, परंतु जिथे भुकेच्या पातळीवर समता साकारता येत नाहही तिथे अन्य बाबतीतली अपेक्षा काय करता यावी? मनाला कमालीचे विषण्ण करणारी ही वेदनादायी परिस्थिती आहे. तेव्हा दिवाळीचा आनंद साजरा करताना भुकेला सामोरे जावे लागत असलेल्या घटकासाठीही संवेदनांची व सहकार्याची एक पणती आपण लावूया.. ही मिणमिणती पणतीच भुकेचा अंधार दूर करू शकेल. आमचे सहकारी पत्रकार, कवी संजय वाघ यांनीही तेच तर म्हटले आहे, ‘लोकशाहीच्या मुळावर रोजच बसे येथे घाव, त्या अंधारलेल्या वाटेवर एक तरी पणती लाव’.

Web Title: A charcoal for hunger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.