वाहतूक खर्चही निघेना : काेराेनामुळे आठवडी बाजार बंद असल्याचा परिणाम
तामलवाडी : ढाेबळी मिरचीच्या माध्यमातून अर्थकारणास आधार मिळेल म्हणून सुरतगाव येथील शेतकऱ्याने सुमारे लाखभर रुपये खर्च करून लागवड केली. सुयाेग्य व्यवस्थापनामुळे पीकही जाेमदार आले. परंतु, मिरची बाजारपेठेत दाखल हाेताच भाव पडले. काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर तर दर आणखी घसरले. परिणामी उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने ढाेबळी मिरचीची तब्बल चाैदा हजार झाडे उपटून बांधावर टाकली.
सुरतगांव शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत नागनाथ नवनाथ गुंड यांची शेती आहे. त्यांनी डिसेंबरमध्ये एक एकर क्षेत्रात पाॅलिथीन पेपरचा वापर करून ठिबक सिंचनच्या सहाय्याने ढोबळी मिरचीच्या चाैदा हजार राेपांची लागवड केली. यावर सुमारे १लाख रुपये खर्च केला. हे पीक दाेन महिने जाेपासल्यानंतर फळधारणेस सुरुवात झाली. यानंतर मिरची माेठ्या प्रमाणात निघू लागली. सुरुवातीला १७ ते १८ रूपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्यामुळे यंदा चांगला फायदा हाेईल, असे शेतकऱ्याने गृहित धरले हाेते. परंतु, अचानक काेराेनाचे रुग्ण वाढू लागले. त्यामुळे आठवडी बंद झाले. परिणामी ढाेबळी मिरचीसाेबतच अन्य भाज्यांचे दरही प्रचंड घसरले. मागील काही दिवसांत तर मिळणाऱ्या पैशातून वाहतूक खर्चही निघत नव्हता. त्यामुळे शेतकरी गुंड यांनी संतप्त हाेऊन शेतातील मिरचीची सुमारे चाैदा हजार झाडे उपटून बांधावर टाकली.
चौकट
इंजिनच्या सहाय्याने मिरचीला पाणी...
ढोबळी मिरचीला फळधारणेवेळी महावितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर जळाला हाेता. दोन महिने आधिकाऱ्याने ट्रान्सफार्मर दुरूस्त करून दिला नाही. त्यामुळे हाताताेंडाशी आलेले पीक वाया जाते की काय? अशी भीती हाेती. त्यामुळे या पिकाला इंजिनच्या सहाय्याने पाणी द्यावे लागले. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये माेठी वाढ झाली.
चौकट
कोबीची अवस्था बिकटच..
राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या १५ गुंठे क्षेत्रात पान कोबीची लागवड केली. सध्या काेबीलाही भाव मिळत नाही. ५ रुपये किलाेनेही काेणी विकत घेण्यास तयार नाही. एका बॅगला २५ ते ३० रुपये दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.