सूडाचा थरार! बहिणीला मारलं असं समजून मेव्हण्याची केली हत्या; तणाव निवळल्यावर उचलून नेलं अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:16 IST2026-04-30T12:15:45+5:302026-04-30T12:16:38+5:30
बहिणीला मारल्याच्या रागातून माहेरच्यांनी पतीची निर्घृण हत्या केली.

सूडाचा थरार! बहिणीला मारलं असं समजून मेव्हण्याची केली हत्या; तणाव निवळल्यावर उचलून नेलं अन्..
Jaipur Crime: संशयाचं भूत डोक्यात शिरल्यावर माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा प्रत्यय उदयपूर जिल्ह्यात आला आहे. आपल्या बहिणीची हत्या केल्याचा संशय मनात धरून एका भावाने आपल्याच मेव्हण्याचे अपहरण केले आणि जंगलात नेऊन दगडाने डोके ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. पिंटूलाल वडेरा (२६) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
बहिणीच्या आजारपणामुळे वादाची ठिणगी
ही घटना ओगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोखला बारा गावात सुरू झाली. मृताची पत्नी पारू (२५) हिची २४ एप्रिल रोजी प्रकृती खालावली होती. तिला उपचारासाठी उदयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र २७ एप्रिलच्या रात्री तिचा मृत्यू झाला. पारूच्या मृत्यूची बातमी मिळताच तिच्या माहेरच्या लोकांचा राग अनावर झाला. पिंटूलाल आणि त्याच्या कुटुंबानेच पारूची हत्या केली, असा आरोप करत माहेरच्या लोकांनी मंगळवारी संध्याकाळी पिंटूच्या घरावर हल्ला चढवला.
पोलिसांसमोरच तोडफोड, पिंटूचं पलायन
मंगळवारी संध्याकाळी जेव्हा १०-१२ सशस्त्र लोक पिंटूच्या घरी पोहोचले, तेव्हा घाबरलेला पिंटू घर सोडून पळून गेला. संतप्त नातेवाईकांनी त्याच्या घराची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस घटनास्थळी हजर असूनही त्यांनी हल्लेखोरांना रोखण्याऐवजी केवळ मोबाईलवर व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बुधवारी सकाळी अपहरण आणि खून
तणाव निवळला असे वाटत असतानाच, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पारूचा भाऊ करण आपल्या साथीदारांसह पुन्हा चोखला बारा गावात पोहोचला. त्यांनी पिंटूलालला बंदुकीच्या धाकावर उचलले आणि तिथून १५ किलोमीटर दूर असलेल्या अंबावी उपरेटाच्या घनदाट जंगलात नेले. ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना अपहरणाची माहिती दिली, पण पोलीस जंगलात पोहोचेपर्यंत उशीर झाला होता.
दगडाने ठेचून संपवले आयुष्य
जंगलात नेल्यानंतर करण आणि त्याच्या साथीदारांनी पिंटूवर भीषण हल्ला केला. एका मोठ्या दगडाने त्याचे डोके ठेचून त्याला जागीच ठार मारले. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पिंटूचा रक्ताळलेला मृतदेह तिथे पडलेला होता आणि आरोपी फरार झाले होते.
गावात तणाव, पोलिसांचा फौजफाटा तैनात
भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून डीएसपी विवेक सिंह राव यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. सध्या गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस आरोपी करण आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.