धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:33 IST2026-05-06T10:33:03+5:302026-05-06T10:33:35+5:30
उमापूरमधील प्रकारानंतर युवकाने पोलीस स्टेशनला धाव घेत याची तक्रार नोंदवली. मला न्याय द्या अशी मागणी युवकाने पोलिसांकडे केली.

धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
बीड - जिल्ह्यात बनावट लग्न करून युवकांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने ग्रामीण भागातील अनेक युवकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अलीकडेच गेवराई तालुक्यातील उमापूर गावात हा प्रकार समोर आला. याठिकाणी एका युवतीने ८ लग्नानंतर नवव्यांदा लग्न करून युवकाला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्याला ८ लाखांना फसवले.
उमापूरला राहणाऱ्या युवकाच्या लग्नासाठी काही एजेन्टने मध्यस्थी केली होती. लग्न जुळवण्याच्या नावाखाली युवकाची लाखो रुपयांची फसवणूक केली. युवक आणि युवतीचे लग्नही झाले. परंतु काही काळातच युवती आणि तिच्या टोळीचा खरा चेहरा उघडकीस आला. ज्या युवतीसोबत युवकाने लग्न केले होते तिचे याआधी ८ जणांसोबत लग्न झाल्याचे तपासात पुढे आले. प्रत्येक वेळी ही टोळी लग्नानंतर काही दिवसांनी पैसे आणि दागिने घेऊन घरातून पसार व्हायची. उमापूरमधील प्रकारानंतर युवकाने पोलीस स्टेशनला धाव घेत याची तक्रार नोंदवली. मला न्याय द्या अशी मागणी युवकाने पोलिसांकडे केली.
युवकाने म्हटलं की, मला अंधारात ठेवून लग्न करण्यात आले होते. ज्या युवतीसोबत लग्न झाले तिचे हे नव्यांदा लग्न करत होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार आहे. नवरी एक अन् नवरे अनेक असा हा प्रकार असून या टोळीने अनेक युवकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासकरून या टोळीने ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या जाळ्यात ओढले. ज्या युवकांची लग्न जुळत नाही, त्यांना कुठलीही मुलगी होकार देत नाही अशा युवकांना ही टोळी फसवायची. या युवकांकडून लाखो रुपये वसूल केले जायचे. त्यानंतर लग्नानंतर काही दिवसांत नवरी घरातील पैसे, दागिने घेऊन लंपास व्हायची. तक्रारीनंतर पोलीस या टोळीतील सदस्यांचा शोध घेत आहेत.