"आम्ही पोलीस आहोत, दागिने पिशवीत ठेवा!"; भररस्त्यात हातचलाखीने वृद्धेचे ९ तोळे सोनं लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:55 IST2026-05-12T12:50:17+5:302026-05-12T12:55:01+5:30
हातचलाखीने लुटले ९ तोळे सोने; चोरट्यांनी चक्क हातावर 'खोबरेल तेल' टाकून काढल्या सोन्याच्या पाटल्या

"आम्ही पोलीस आहोत, दागिने पिशवीत ठेवा!"; भररस्त्यात हातचलाखीने वृद्धेचे ९ तोळे सोनं लुटले
छत्रपती संभाजीनगर : मंदिरातून घराकडे निघालेल्या वृद्ध महिलेला पोलिस असल्याची बतावणी करीत, ओळखपत्र दाखवून या परिसरात चोऱ्या होत आहेत. तुमच्या अंगावरील साेन्याचे दागिने पिशवीत ठेवा, असे सांगितले. पोलिस असल्याचे सांगितल्यामुळे वृध्देचा विश्वास बसल्यानंतर ९ तोळे वजनाच्या हातातील बागड्या, गळ्यातील दागिने, बोटातील अंगठ्या काढून पिशवीत ठेवल्या. त्यानंतर भामट्यांनी हातचलाखी करीत पिशवीत दुसऱ्याच व्यक्तीचे कडे ठेवून दागिने लंपास केले. हा प्रकार छत्रपती कॉलेजसमोर सोमवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत.
श्रीकंवरबाई इंदरचंदजी लुंकड (६७, रा. स्वामी विवेकानंदनगर, गारखेडा परिसर) यांच्या फिर्यादीनुसार त्या दररोज घरातूून सकाळी साडेनऊला जैन मंदिर, एन- ३, गारखेडा परिसराकडे जातात. मंदिरातून दररोज पायी चालत येतात. सोमवारी सकाळी साडेदहाला त्या मंदिरातून घरी जाण्यासाठी निघाल्या. छत्रपती कॉलेजसमोरील रस्त्यावर असताना समोरून दोन व्यक्ती एका दुचाकीवर आले. त्यांनी खिशातील आयकार्ड दाखवून आम्ही पोलिस आहोत. या परिसरात सतत चोऱ्या होत आहेत. त्यामुळे तुमच्याजवळील दागिने हातातील पिशवीत काढून ठेवा, असे सागितले. त्याचवेळी दुचाकीवर दुसरा एक व्यक्ती आला. त्यानेही हातातील पिवळे कडे काढायचे असल्याचे सांगून तो काढू लागला. फिर्यादीने हातातील ६ तोळ्याच्या पाटल्या, गळ्यातील दोन तोळे वजनाची कंठी आणि बोटातील प्रत्येकी ४ ग्रॅमच्या दोन अंगठ्या काढून पिशवीत ठेवल्या. त्यानंतर दुचाकीवरील भामट्यांनी त्या बाहेर काढून स्वत:कडील पिशवीत ठेवतो, असे सांगून, फिर्यादीच्या हातातील पिशवी घेऊन त्यातील दागिने दुसऱ्या पिशवीत ठेवून पिशवीला तीन गाठी मारल्या. तेव्हा फिर्यादीने सोने दाखविण्याची मागणी केली असता त्यांनी हातात पिशवी देऊन उघडून बघत बसा, असे म्हणून पोबारा केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करीत आहेत.
पाटल्या निघत नव्हत्या म्हणून खोबरेल तेल दिले
पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यांना फिर्यादीने हातातील पाटल्या निघत नसल्याचे सांगितले. तेव्हा भामट्यांनी फिर्यादीच्या हातावर खोबरेल तेलाची बॉटल काढून त्यातील थेंब हातावर टाकले. त्यानंतर हातातील पाटल्या निघाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.