छ. संभाजीनगरच्या मातीतच घडला ‘IFS’ अधिकारी; प्रतीक कुशारेची 'सेल्फ स्टडी'च्या जोरावर बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:56 IST2026-05-11T13:54:40+5:302026-05-11T13:56:05+5:30
"निकाल पाहताना हात थरथरला, पण डोळ्यांत आनंदाश्रू तरळले!" ४ वेळा अपयश आले, पण आईच्या विश्वासाने इतिहास घडवला

छ. संभाजीनगरच्या मातीतच घडला ‘IFS’ अधिकारी; प्रतीक कुशारेची 'सेल्फ स्टडी'च्या जोरावर बाजी
छत्रपती संभाजीनगर : युपीएससीचा निकाल जाहीर होतो...अनेकदा अपयशाची यादी पाहण्याची सवय झालेल्या डोळ्यांमध्ये यावेळी एक वेगळीच धाकधूक असते. यावेळी तरी आपलं नाव असेल का, हा विचार मनात काहूर माजवतो. पण गुणवत्ता यादीत ‘प्रतीक चंद्रशेखर कुशारे, ऑल इंडिया रँक १००’ हे नाव झळकले, तेव्हा पाच वर्षांचा थकवा, ताणतणाव आणि अपयशाच्या सर्व खुणा एका क्षणात पुसून आनंदाश्रू तरळले. ही कहाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या एका जिद्दी तरुणाची, ज्याने दिल्ली-पुण्याची वाट न धरता, शहरात राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘भारतीय वन सेवेत’ देदीप्यमान यश मिळविले.
प्रतीकने २०१३ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर शासकीय तंत्रनिकेतन येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमधून २०१९ मध्ये बी.ई.ची पदवी घेतली. पदवी हातात आल्यावर त्याने कॉर्पोरेट नोकरीच्या मागे न धावता देशसेवेचे आणि प्रशासनात जाण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले व २०२० पासून पूर्णवेळ युपीएससीची तयारी सुरू केली.
आई ढाल बनून उभी
स्पर्धा परीक्षेचा रस्ता कधीच सोपा नसतो. कधी पूर्वपरीक्षेत तर कधी मुख्य परीक्षेत अपयश पदरी पडले. सलग चार प्रयत्नांत अपयश आल्यावर कोणताही सामान्य तरुण खचून गेला असता. अपयशाच्या मालिकेने निराश झालेल्या प्रतीकच्या मनातही अनेकदा विचार आला, आता बस..मी थांबवतो आणि दुसरी एखादी नोकरी किंवा करिअरचा मार्ग निवडतो. पण या अंधारात एक आशेचा किरण होता त्याची आई. शिक्षिका असलेल्या आईने आणि शेती करणाऱ्या वडिलांनी त्याला खंबीर साथ दिली. आईच्या ठाम विश्वासावर तो पुन्हा उभा राहिला अन् यश खेचून आणले.
सलग पाच वर्ष सेल्फ स्टडी
स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांची पहिली पसंती दिल्ली किंवा पुण्याला असते. पण प्रतीकने हा समज खोटा ठरवला. सलग ५ वर्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या घरी राहूनच ‘सेल्फ स्टडी’ केली. रोज ८ तास तो अभ्यास करत असे. योग्य नियोजन, स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास आणि अफाट चिकाटी या जोरावर त्याने मर्यादित साधनसामग्रीत हे यश मिळविले. भारतीय वनसेवेच्या माध्यमातून जंगल वाढ, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्याची इच्छा आहे.
अपयश आले तरी थांबू नका
यश एका दिवसात मिळत नाही. सातत्य, संयम आणि स्वतःवर असलेला विश्वास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. अपयश आले तरी थांबू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.
-प्रतीक कुशारे