सांगा, कसा प्रवास करायचा ? छत्रपती संभाजीनगरच्या १८ लाख लोकसंख्येसाठी फक्त ७३ सिटी बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 20:23 IST2026-05-14T20:21:46+5:302026-05-14T20:23:53+5:30
केवळ मुख्य रस्त्यांवरच बस, शहरातील अंतर्गत भागात जायचे तर रिक्षाला मोजा जादा भाडे

सांगा, कसा प्रवास करायचा ? छत्रपती संभाजीनगरच्या १८ लाख लोकसंख्येसाठी फक्त ७३ सिटी बस
- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : इंधनाच्या बचतीसाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र, १८ लाख लोकसंख्येच्या छत्रपती संभाजीनगर शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी अवघ्या ७३ स्मार्ट सिटी बस धावत आहेत. त्याही मुख्य रस्त्यांवरच. शहरातील अंतर्गत भागात जायचे म्हटले तर रिक्षांशिवाय पर्याय नाही. त्यासाठीही मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीने कसा प्रवास करायचा, असा प्रश्न शहरवासीयांकडून केला जात आहे.
सध्या शहर परिसरात २५ मार्गांवर ७३ बस धावणार आहेत. यात सर्वाधिक १४ बस या बिडकीन, फुलंब्री मार्गावर धावत आहेत. त्यापाठोपाठ रांजणगावसाठी १० बस धावत आहेत. इतर मार्गांवर १ ते ६ बस धावत आहेत.
चिकलठाणा ते आकाशवाणी ५८ रिक्षा, एक सिटी बस
चिकलठाणा ते आकाशवाणी मार्गावर दुचाकीवरून प्रवास करण्यात आला. २० मिनिटांच्या या प्रवासात तब्बल ५८ रिक्षा आढळल्या, तर अवघी एक सिटी बस धावताना दिसली.
किती असाव्यात सिटी बस ?
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, तसेच विविध शहरी वाहतूक अभ्यासांनुसार...
- किमान गरज : ४० बस प्रति एक लाख लोकसंख्या.
- चांगली सेवा : ६० बस प्रति एक लाख लोकसंख्या.
- आदर्श व्यवस्था : १०० बस प्रति एक लाख लोकसंख्या.
दररोज २०१ नव्या दुचाकी रस्त्यावर
२०२५-२६ या वर्षात ७३ हजार ६१२ नव्या दुचाकी आणि १३ हजार ३४७ चारचाकी रस्त्यावर आल्या. म्हणजे दररोज २०१ आणि ३६ चारचाकीची भर पडली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यानेच दुचाकी घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
एक हजार सिटी बसची गरज
किमान एक हजार सिटी बसची गरज आहे. यात ५०० बस शहरात आणि ५०० बस या शहराबाहेरील परिसरासाठी हव्यात.
- प्रशांत भुसारी, माजी विभाग नियंत्रक- एसटी महामंडळ तथा माजी मुख्य चालन अधिकारी, स्मार्ट सिटी बस
सिटी बसची संख्या वाढावी
मुंबई, पुण्याप्रमाणे शहरात सिटी बससेवा हवी. रिक्षांना मीटर नसल्याने मनमानी भाडे आकारले जाते.
- ॲड. ज्योती पत्की
उभे राहण्याची वेळ
सिटी बसच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था वाढविली तरच सगळे शक्य होईल.
- नानक वेदी, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत.
खेड्यापर्यंत, पण अंतर्गत भागांत नाही
सिटी बस ही खेड्यापाड्यापर्यंत जात आहे. परंतु, शहरातील अंतर्गत भागात जात नाही. गॅसचे दर वाढल्याने रिक्षाचालकांचे हाल होत आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे.
- बालाजी आडे, संस्थापक सचिव, महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटना
शेअरिंगचे दरच ठरेना
शेअरिंग रिक्षांचे दर निश्चित झाले तर प्रवाशांचा फायदा होईल. शासनाने हे दर ठरवावेत.
- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक मालक महासंघ
जिल्ह्यातील एकूण वाहने
दुचाकी : १५,३४,९७९
चारचाकी : २,३०,१५१
रिक्षा : ३२,०८८
इतर वाहने : १,५८,८२३