औरंगाबादमध्ये लाळेचे नमुने बंद; नाकातून कोरोना टेस्टचे नमुने घेणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:25 PM2020-07-02T13:25:09+5:302020-07-02T13:31:48+5:30
बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त वर्दळ वाढू लागली. सायंकाळी पाच नंतरही नागरिक नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत आहेत.
औरंगाबाद : कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने संशयित रुग्ण तपासणीवर मागील दोन-तीन दिवसांपासून सर्वाधिक भर दिला आहे. त्यात वाढ करावी, अशा सूचना प्रशासनाने आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी मोठ्या प्रमाणात भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने त्यादृष्टीने कोविड केअर सेंटरची संख्या वाढविली आहे.
महाराष्ट्र शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केली. बाजारपेठेत गरजेपेक्षा जास्त वर्दळ वाढू लागली. सायंकाळी पाच नंतरही नागरिक नियमांचे पालन न करता घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मागील एक महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची ही वाढ समूह संसर्गाकडे नेणारी आहे. शहरातील एक हजार वसाहतींमध्ये कोरोनाने हातपाय पसरले. दररोज अडीचशे- तीनशे रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढू लागली आहे. शहरात आठ ठिकाणी कोरोना टेस्टसाठी नमुने घेतले जातील. एका मोबाईल टीमची नियुक्ती केली. यात आणखी वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी पाण्डेय यांनी घेतला. दहा मोबाईल टीम शहर बस घेऊन फिरणार आहे. एका बसमध्ये आरोग्य विभागाचे पाच कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यानंतर कोरोना टेस्टची संख्या दुपटीने वाढेल. रुग्णसंख्याही दुप्पट होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर, अलगीकरण कक्षांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
२ पद्धतीने नमुने घेण्याची पद्धत
संशयित कोरोना रुग्णाची तपासणी करताना पूर्वी घशातील लाळेचे नमुने, तसेच नाकातून नमुने घेण्यात येत होते. यातील एक पद्धत महापालिकेने बंद केली आहे. आता फक्त नाकाद्वारे नमुने घेण्यात येत आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी नमूद केले की, लाळेच्या नमुन्यापेक्षा नाकातील नमुने अधिक प्रभावी ठरत असल्यामुळे ही पद्धत अवलंबिण्यात आली आहे.
शहरी भागात घेण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या
२५ जून - ३१५
२६ जून - ३८६
२७ जून - ४४४
२८ जून - ३८६
२९ जून - ५२६
३० जून - ५०६
०१ जुलै- ६३६