शहरातील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:42+5:302021-02-05T04:12:42+5:30
शहरातील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कडधान्य, डाळीची प्रतीक्षा, मिळतोय फक्त तांदूळ कोरोना इम्पॅक्ट : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांदळासह, डाळ, कडधान्य ...

शहरातील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात
शहरातील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कडधान्य, डाळीची प्रतीक्षा, मिळतोय फक्त तांदूळ
कोरोना इम्पॅक्ट : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांदळासह, डाळ, कडधान्य वाटप
-योगेश पायघन
औरंगाबाद : कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाच्या पोषण आहारात तांदळासह कडधान्य शिजवून न देता विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांदूळ, मूगदाळ, चवळी, मटकीचे उन्हाळी सुट्यांपासून जानेवारीपर्यंतचे धान्य वाटप करण्यात आले. मात्र, शहरातील ३५० शाळांतील १ लाख ६ हजार ३०० विद्यार्थ्यांना जानेवारीपर्यंतचे केवळ तांदळाचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांना जून ते जानेवारी पर्यंतच्या डाळ आणि कडधान्याची अद्यापही प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील ३०५३ शाळांत शालेय पोषण आहार कोरोनामुळे तांदळासह कडधान्य शिजवून न देता विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. पहिली ते पाचवीच्या २ लाख ७८ हजार १२७ विद्यार्थ्यांना सहा किलो तांदूळ, १५०० ग्रॅम दाळ, तर १३८० ग्रॅम कडधान्य आणि सहावी ते आठवीच्या १ लाख ७४ हजार ७८४ विद्यार्थ्यांना ९ किलो तांदूळ, २२५० ग्रॅम दाळ, २०७० ग्रॅम कडधान्याचे वाटप करण्यात आले. दाळीमध्ये मूगदाळ आणि पूर्वी कडधान्यात चवळी होती तर यावेळी मटकी वाटप करण्यात आली आहे. शहरातील ज्या शाळांचा सेंट्रल किचनमध्ये समावेश आहे त्यांना आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आहारात फरक असल्याने पालकांसह शिक्षकांकडून असा दुजाभाव का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
---
धान्य कडधान्य वाटप
--
शहरात शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ३५० शाळांत मध्यवर्ती स्वयंपाकघरातून माध्यान्ह भोजनाची व्यवस्था आहे. तर ग्रामीण भागात पोषण आहार शिजवून देण्याची तेथील संस्था प्रशासनावर जबाबदारी आहे. मात्र, कोरोनामुळे अन्न शिजवून न देता पालकांना धान्य वाटण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यात मध्यवर्ती किचनसाठी वेगळा पुरवठादार असून ग्रामीणसाठी वेगळ्या पुरवठादाराची व्यवस्था आहे. त्यांच्यामार्फत शाळांना व शाळांकडून लाभार्थ्यांना वाटप केले जाते, असे पोषण आहार विभागाकडून सांगण्यात आले.
प्रक्रिया अंतिम टप्प्यात
शहरात मध्यवर्ती स्वयंपाकघरातून ३५० शाळांना पोषण आहार दिला जात होता. ज्या शाळांना सेंट्रल किचनमधून आहार दिला जातो. त्यांना केवळ तांदूळ आणि उर्वरित शाळांत तांदूळ, मटकी आणि मूगदाळ असा जानेवारी पर्यंतचा पोषण आहार शासन आदेशाप्रमाणे वाटप करण्यात आला. सेंट्रल किचनसाठीचे नवे पुरवठादार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती नेमणूक फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांना आतापर्यंतची दाळ व कडधान्य वाटप करण्यात येणार आहे.
-भाऊसाहेब देशपांडे, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जिल्हा परिषद शिक्षण विभाग
---
४,५२,९११
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी
---
१,०६, ३००
शहरी लाभार्थी
--
३,३६,६११
ग्रामीण लाभार्थी