जिल्हा परिषद अध्यक्षपदाची रणनीती ठरविण्यासाठी मनसेचे सदस्य मुंबईकडे

By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:26:50+5:302014-09-10T00:52:19+5:30

जिल्हा पदाधिकाऱ्यांसह मनसेचे आठही जि.प. सदस्य मुंबईकडे रात्री रवाना झाले.

MNS members Mumbai to decide the post of chairman of the Zilla Parishad | जिल्हा परिषद अध्यक्षपदाची रणनीती ठरविण्यासाठी मनसेचे सदस्य मुंबईकडे

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची रणनीती ठरविण्यासाठी मनसेचे सदस्य मुंबईकडे

औरंगाबाद : नाशिक महापालिकेत मनसेची सोबत सोडून भाजपा शिवसेनेसोबत गेल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीचे डावपेच ठरविण्यासाठी मनसेच्या सदस्यांना पक्षश्रेष्ठींनी विचारविमर्श करण्यासाठी मुंबईला पाचारण केले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांसह मनसेचे आठही जि.प. सदस्य मुंबईकडे रात्री रवाना झाले.
नाशिक महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेली मनसे, भाजपा युती मंगळवारी तुटली. भाजपाने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आठ सदस्यांसह तीन जिल्हाध्यक्षांना पक्षनेते आ. बाळा नांदगावकर यांनी तातडीने मुंबईला बोलाविले. औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता गेल्या अडीच वर्षांपासून आहे. या सत्तेतून मनसेला दोन सभापतीपदे मिळाली आहेत; परंतु अडीच वर्षांत काम वाटपावरून आघाडीत ताणतणावाचे अनेक प्रसंग घडले. त्यातून मनसेचे काही सदस्य नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जि.प.साठी मनसेचे डावपेच काय राहतील, हे उद्या मुंबईत ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसेला सोबत घेतल्याशिवाय आघाडी किंवा युती सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यामुळे मनसेचे महत्त्व वाढलेले आहे.

Web Title: MNS members Mumbai to decide the post of chairman of the Zilla Parishad