उपवर्गीकरण हटवा, आरक्षण वाचवा! रणरणत्या उन्हात छ. संभाजीनगरात आंबेडकरी कार्यकर्त्यांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:45 IST2026-04-28T18:42:07+5:302026-04-28T18:45:43+5:30
आरक्षणाची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी; आमखास मैदान ते विभागीय आयुक्तालयापर्यंत कार्यकर्त्यांचा जनसागर.

उपवर्गीकरण हटवा, आरक्षण वाचवा! रणरणत्या उन्हात छ. संभाजीनगरात आंबेडकरी कार्यकर्त्यांचा एल्गार
छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात सोमवारी आंबेडकरवादी पक्ष-संघटनांनी भरदुपारी रणरणत्या उन्हात विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. मात्र, या मोर्चात पदाधिकाऱ्यांतील फुटीची किनार दिसून आली. मोर्चात आंबेडकरी चळवळीतले नेहमीचे काही चेहरे दिसलेच नाहीत.
सोमवारी दुपारी १२:३० वाजता रखरखत्या उन्हातच आमखास मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. हातात “आरक्षण बचाव- उपवर्गीकरण हटाव”, ‘खासगीकरणात आरक्षण लागू करा, न्यायपालिकेत आरक्षण लागू करा’या हे फलक घेऊन कार्यकर्ते घोषणा देत होते.
विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, ॲड. रमेशभाई खंडागळे, रमेश गायकवाड, गौतम लांडगे, नगरसेवक अमित भुईगळ, अफसर खान, कृष्णा बनकर, बंडू कांबळे, सचिन निकम, सतीश गायकवाड, पंडित बोर्डे, सुनील वाकेकर, विजय मगरे, लक्ष्मण हिवराळे, विजय वाहूळ, संतोष भिंगारे, मुकुल निकाळजे, कृष्णा भंडारे, राजू साबळे आदींच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना निवेदन सादर केले.
निवेदनात अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करणे हा सामाजिक न्याय, समता व बंधुता या संविधानिक मूल्यांच्या विरोधात जाणारा निर्णय असून, तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसून, त्याची कार्यपद्धती व डेटा याबाबत पारदर्शकता नसल्याचे नमूद करण्यात आले.
अनुसूचित जातींमधील विषमता दूर करण्यासाठी उपवर्गीकरण हा उपाय नसून, शिक्षण, रोजगार, शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि कौशल्य विकास यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आरक्षणाची मर्यादा १३ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याठिकाणी विविध नेत्यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन विजय वाहूळ यांनी केले. मोर्चामध्ये तरुण, महिला आणि विविध समाज घटकांचा मोठा सहभाग दिसून आला. सुमित भुईगळ व मित्र मंडळातर्फे किलेअर्क चौकात मोर्चेकऱ्यांना थंड पाणी व शरबताची व्यवस्था करण्यात आली होती.