राजतडाग ते छत्रपती संभाजीनगर! ६ वेळा ‘नामांतर’, एकदा ‘नामविस्तार’ झालेले ऐतिहासिक शहर
By प्रभुदास पाटोळे | Updated: April 20, 2026 19:39 IST2026-04-20T19:38:04+5:302026-04-20T19:39:02+5:30
‘राजतडाग’ ते ‘छत्रपती संभाजीनगर’चा सुमारे एक हजार वर्षांचा रंजक इतिहास

राजतडाग ते छत्रपती संभाजीनगर! ६ वेळा ‘नामांतर’, एकदा ‘नामविस्तार’ झालेले ऐतिहासिक शहर
- प्रभुदास पाटोळे
छत्रपती संभाजीनगर : १० व्या शतकापासून आजतागायत (२० व्या शतकापर्यंत) ६ वेळा ‘नामांतर’ आणि एकदा ‘नामविस्तार’ झालेल्या आजच्या छत्रपती संभाजीनगरचाइतिहास मोठा रंजक आहे. विशेष म्हणजे तत्कालीन प्रतिष्ठान (पैठण) ही ‘सातवाहन’ राजघराण्याची राजधानी तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही ‘यादव’ घराण्याची राजधानी आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत आहेत.
प्राचीन संदर्भ
मलिक अंबर यांनी १६१० साली खडकी गाव वसविल्याचे सांगितले जाते. मात्र, तत्पूर्वी येथे ‘राजतडाग’ (रॉयल लेक) नावाचे गाव होते. याचा उल्लेख मुंबईतील कन्हेरी गुफेतील शिलालेखावर आहे. तसेच उज्जैन, महेश्वर , बुरहानपूर , अजिंठा, भोकरदन राजतडाग, प्रतिष्ठान (पैठण) मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावापर्यंतचा व्यापारी मार्ग राजतडाग येथून जात असल्याच्या नोंदी १० व्या शतकापर्यंत आहेत. ‘राजतडाग’मधून सुती कापड निर्यात केले जात असे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगत ‘औरंगाबाद लेणी’ म्हणून संबोधली जाणारी लेणी मुळात वाकाटक राष्ट्रकुट कालीन ‘राजतडाग लेणी’ असून त्याच काळात वेरूळ, अजिंठा, पितळखीरा आदी लेण्यासुद्धा खोदण्यात आल्या होत्या.
६ वेळा नामांतर
मधल्या काळातील ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी बेसाल्ट खडकावर वसलेले गाव म्हणून त्याला ‘खडकी’ असे संबोधले जात असे. सध्या खडकेश्वर परिसरातील ग्रामदैवत ‘खडकेश्वर महादेव’ च्या नावावरून गावाला खडकी संबोधले जात असे. १६१० साली मलिक अंबर यांनी नहर-ए-अंबरीद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून खडकीचा विकास केला. त्यानंतर १६३३ ला मलिक अंबरचा मुलगा फतेहखान राजा झाला. त्याने स्वत:च्या नावावरून खडकीचे नाव ‘फतेहनगर’ केले. त्यानंतर १६५३ मध्ये औरंगजेब बादशहा दख्खनचा सुभेदार असताना त्याने फतेहनगरचे नामांतर ‘खुजीस्ता बुनियाद’ (श्रेष्ठतेचा पाया) असे केले. नंतर मोगल बादशहा झाल्यानंतर औरंगजेब बादशहा यांनी १६५८ ला स्वत:च्या नावावरून पुन्हा शहराचे नाव बदलून ‘औरंगाबाद’ केले होते. जे २० व्या शतकापर्यंत तसेच होते. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे जात असताना १६६६ साली त्यांंनी औरंगाबादेत औरंगजेब बादशहाची भेट घेतल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत.
औरंगजेब बादशहाच्या निधनानंतर दख्खनचा मोगल सरदारनिजाम असफ (प्रथम) यांनी १७२४ ला मोगल साम्राज्यातीून बाहेर पडून असफजाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ ला त्यांची राजधानी हैदराबाद येथे स्थलांतरित होईपर्यंत ‘औरंगाबादला’च त्यांची राजधानी होती. जी १९५५ पर्यंत औरंगाबाद निजाम राजवटीचा एक भाग होता. हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६०ला झाली. त्या दिवसापासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले.
७ व्या वेळी नामविस्तार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ व्हावे अशी १९८८ साली मागणी केली होती. २९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. अशाप्रकारे राजतडाग, खडकी, फतेहनगर, खुजीस्ता बुनियाद , औरंगाबाद आणि संभाजीनगर असे ६ वेळा नामांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी १७ जुलै २०२२ रोजी "संभाजीनगर" नावाचा विस्तार करून "छत्रपती संभाजीनगर" असा शहराचा नामविस्तार केला. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ ला महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप विभाग, तालुका आणि गाव यांच्या "छत्रपती संभाजीनगर" नामांतरास मंजुरी दिली होती. दि. २९ ऑगस्ट २०२५ ला औरंगाबादच्या छावणी परिषदेचे, २६ ऑक्टोबर २०२५ ला रेलवेस्थानकाचेसुद्धा नामांतर "छत्रपती संभाजीनगर" झाले आहे.