पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 20:57 IST2026-04-20T20:56:34+5:302026-04-20T20:57:04+5:30
धक्कादायक : काैटुंबिक वादातून घेतला टाेकाचा निर्णय...

पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
खरोसा (जि. लातूर) : रविवारी रात्री झालेल्या काैटुंबिक किरकाेळ वादातून एका २२ वर्षीय मातेने आपल्या पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह विहिरीमध्ये उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. केवळ काैटुंबिक वादातून मातेने टाेकाचा निर्णय घेत मृत्यूला कवटाळले. या हृदयद्रावक घटनेने खराेसा गावावर शाेककळा पसरली असून, लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाेलिसांनी सांगितले की, लातूर जिल्ह्यातील खरोसा (ता. औसा) येथील निकिता अमरदीप भुरे (वय २२) हिच्यासाेबत रविवारी रात्री किरकोळ कारणावरून कौटुंबिक वाद झाला होता. दरम्यान, या वादातून आलेल्या मानसिक तणावातून निकिताने अतिशय टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. रविवारी रात्रीच्या सुमारास तिने आपले दोन चिमुकले मुलगी शिवानी आणि मुलगा शिवांश यांना सोबत घेतले. घरानजीक असलेल्या विहिरीकडे धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्यांना छातीशी कवटाळत तिने विहिरीत उडी घेतली. निकिता आणि दाेन चिमुकले दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शाेधाशाेध सुरू केली. दरम्यान, एका विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. ही घटना साेमवारी सकाळी समाेर आली. या घटनेने भूरे कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. याबाबत किल्लारी पाेलिस ठाण्यात मनोज भरत भूरे यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हृदय पिळवटून टाकणारी घटना...
या घटनेत निकितासोबतच त्या निष्पाप बहीण-भावाचाही दुर्दैवी अंत झाला. ज्या वयात खेळायचे-बागडायचे, त्या वयात या चिमुरड्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच किल्लारी पोलिस ठपाण्याचे पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले, त्यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने केवळ खरोसा गावच नव्हे, तर संपूर्ण औसा तालुका सुन्न झाला आहे.
काैटुंबीक वादातून टाेकाचे उचलले पाऊल...
पाेलिसांनी सांगितले की, घरगुती वादातून निकिताने हे पाऊल उचलले असावे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते तत्काळ लामजना येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.