जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST2021-02-05T04:14:25+5:302021-02-05T04:14:25+5:30

पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मत: पर्यटन, कृषी, उद्योगासाठी कालबध्द योजना औरंगाबाद : जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होऊन शून्य मृत्यूदर होईल. ...

The district will soon be corona-free | जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार

जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होणार

पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मत: पर्यटन, कृषी, उद्योगासाठी कालबध्द योजना

औरंगाबाद : जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होऊन शून्य मृत्यूदर होईल. पर्यटन, कृषी, उद्योग, पाणीपुरवठा आदी विभागांच्या कालबद्ध योजनेतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिला.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते झाले, यावेळी देसाई बोलत होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना योध्द्यांना पहिल्या टप्प्यातील लसीकरण करणे सुरू झाले. कोरोनाचा शेवट करायचा असल्याने सर्वांना लस मिळेपर्यंत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल. कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल केंद्रामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी देसाई यांच्याहस्ते विविध पुरस्कार, बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांच्यामते जिल्हा आघाडीवर

जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत एकूण ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात रेशीम उद्योगात ९ तालुक्यांमध्ये १३०७ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून कोष निर्मिती केंद्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवभोजन योजनेचा ७ लाख १ हजार ९७८ लोकांनी लाभ घेतला आहे. ऑरिक सिटी शेंद्रा येथे एका रशियन कंपनीस स्टिल उत्पादनासाठी ४४ एकर जागेचे वाटप केले आहे. या कंपनीत १ हजार कोटींची गुंतवणूक होऊन स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. डीएमआयसी शेंद्रा येथे २०२० मध्ये ६२ एकरचे २० भूखंड वाटप केले आहेत. ७०६ कोटींच्या जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळेल, असा दावा पालकमंत्र्यांनी केला.

Web Title: The district will soon be corona-free