८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:34+5:30
विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुपटीने चाचण्या करण्यात येत आहेत. आता थोडेफार लक्षणे दिसत असतील तर नागरिकही स्वयंस्फूर्तीने चाचण्या करू लागले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत ८५ हजार ४८४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.
विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. यातील लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी केली जात होती. मात्र आता संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्वांच्याच चाचण्या केल्या जात आहे.
कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९६ हजार ५३७ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९६ हजार ४२ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या केवळ ४९५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार ४८४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ४१ हजार ८६० चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर ४३ हजार ६२४ चाचण्या अॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर आठ हजार ४९९ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल यायचा असून ४०७ चाचण्यांबाबत संभ्रम आहे.
संपर्कातून होत आहे संसर्ग
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.