ऑनलाईन परवानगी ठरली मुलाच्या लग्नात अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:48+5:30
लग्नाचा मुहुर्त येईपर्यंत गाड्या घोड्यांची ऑनलाईन परवानगी मिळत नसल्याने कुटुंबीयातीलच लोकांना स्वत:ची समजूत काढून घरी राहण्यातच धन्यता मानावी लागत आहे. वडीलांचे नुकतेच निधन झाल्याने आपल्या लग्न कार्यात जन्मदात्या आईची तरी उपस्थिती राहावी, या अपेक्षेने परवानगीसाठी ऑनलाईन केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे बुधवारी एकट्या नवरदेव मुलाला वधू मंडपी जावून लग्नकार्य पार पाडावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळात नियोजित लग्न सोहळे केवळ सोपस्कर ठरले असल्याने वर-वधूच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले आहे. लग्नाचा मुहुर्त येईपर्यंत गाड्या घोड्यांची ऑनलाईन परवानगी मिळत नसल्याने कुटुंबीयातीलच लोकांना स्वत:ची समजूत काढून घरी राहण्यातच धन्यता मानावी लागत आहे. वडीलांचे नुकतेच निधन झाल्याने आपल्या लग्न कार्यात जन्मदात्या आईची तरी उपस्थिती राहावी, या अपेक्षेने परवानगीसाठी ऑनलाईन केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे बुधवारी एकट्या नवरदेव मुलाला वधू मंडपी जावून लग्नकार्य पार पाडावे लागले.
वर्धा जिल्ह्यातील आगरगाव येथील हरिभाऊ काळे यांच्या आरती नामक मुलीचा लग्नसोहळा बल्लारपूर निवासी रितेश दादाजी खिरवडकर यांच्यासोबत ३ जून रोजी पार पडला. अतिशय साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून बंधू मंडपी लग्नाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. आधी हा लग्नसोहळा ३ एप्रिल रोजी नियोजित होता. परंतु कोरोनाच्या संक्रमणातील लॉकडाऊनच्या कडक निर्बंधामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. संपूर्ण कुटुबियांना या कार्यात सहभागी होता यावे, यासाठी रितेश खिरवडकर याने परवानगीसाठी प्रयत्न केले. रितेशच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यामुळे आपल्या पोटच्या गोळ्याचे लग्न ‘याची डोळा’ बघणे आईची सर्वोत्तम इच्छा. मात्र आईला व अन्य कुणालाही लग्नसोहळ्यात जाण्याची परवानगी न मिळाल्याने अखरे नवरदेव रितेशला आपल्या एका मित्राला सोबत घेऊन वधुमंडपी पोहचावे लागले. त्यामुळे नवरदेवाच्या आईला या आनंदाच्या क्षणापासून वंचित रहावे लागले.