वरोरा तालुक्यात तयार होत आहे ‘कांदा चाळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:57+5:30
तालुक्यातील शेतकरी यापूर्वी पाच आर जमिनीमध्ये कांद्याची लागवड करीत होते. यामध्ये कुटुंबाकरिता कांदा वर्षभर पुरत असे. कांदा खराब होतो त्यामुळे त्याची साठवण करणे मोठी कसोटी असते. कांद्याचे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात पाऊस असल्यामुळे पीक खराब होते. डिसेंबर जानेवारी महिन्यात लागवड केली जाते. १२० दिवसात कांद्याचे पीक हाती येते.
प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : काही वर्षांपूर्वी कुटुंबाला वर्षभर लागतील एवढे कांद्याचे पीक घेतल्या जात होते. आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेवून आर्थिक लाभाचा विचार करीत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थिती ४० कांदा चाळ आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तालुक्यातील शेगाव महसूल मंडळात तयार झाल्याने अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
तालुक्यातील शेतकरी यापूर्वी पाच आर जमिनीमध्ये कांद्याची लागवड करीत होते. यामध्ये कुटुंबाकरिता कांदा वर्षभर पुरत असे. कांदा खराब होतो त्यामुळे त्याची साठवण करणे मोठी कसोटी असते. कांद्याचे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात पाऊस असल्यामुळे पीक खराब होते. डिसेंबर जानेवारी महिन्यात लागवड केली जाते. १२० दिवसात कांद्याचे पीक हाती येते. कांदा पीक निघाल्यानंतर साठवून करण्यासाठी कृषी विभाग एकात्मिक फलोत्पादन उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश यांनी विशेष उत्सुकता दर्शविली. त्यांच्या मार्गदर्शनात शेगाव कृषी मंडळाचे कृषी पर्यवेक्षक विजय काळे यांनी काही वर्षांपासून कांदा चाळ उभारण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. गतवर्षी येरखेडा येथील आशिष सरपाते यांनी कांदा चाळ उभी केली होती. यासाठी कृषी विभागाने पाठबळ दिले. त्यामुळे आता शेगाव मंडळात ३२ कांदा चाळ उभ्या झाल्या आहेत. कांदा चाळ जमिनीपासून दोन फुट उंचावर असते. साठवणूक केलेल्या कांद्याला हवा मिळाली तर खराब होत नाही. कांदा विकल्यानंतर त्या चाळीमध्ये शेतातील इतर पीक, अवजारे ठेवण्यासाठी वापर केला जातो. कृषी विभागाचे राजुरकर, दुर्गे, चुनडे, मडावी आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याने तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड केली जात आहे.
कांदा चाळ उभारण्यास अनुदान
शासन कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन अभियानाअंतर्गत कांदा चाळ उभारण्यासाठी ७० हजारांचा खर्च येतो. याकरिता शासनाकडून ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे.
शेगाव कृषी मंडळातील शेतकरी नवीन योजना शेतात राबविण्यास उत्सुक आहेत. कृषी विभागाने दिलेले ज्ञान आत्मसात करतात. लागवडीदरम्यान संपर्क करतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत तयार करत आहेत. शेतकºयांनी आता पारंपरिक पिकांवर अवलंबून राहू नये.
- विजय काळे, पर्यवेक्षक, शेगाव मंडळ, कृषी विभाग
दरवाढीचा फायदा
कांद्याची साठवणूक करताना काळजी घेतली नाही तर खराब होतो. त्यामुळे कांदा निघाल्याबरोबर शेतकरी अत्यंत कमी भावात विकतात. मात्र, कांदा चाळीमुळे खराब होत नाही. दरवाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना कांदा विकता येतो. यंदा कांदा चाळीमुळे अनेक शेतकऱ्यांना दरवाढीचा लाभ घेता आला. शेतकऱ्यांनी चौकटीच्या पलिकडे गेल्यास लाभ होऊ शकतो.