रेल्वेच्या पत्रामुळे ताडाळी येथील नागरिक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 06:00 AM2019-08-24T06:00:00+5:302019-08-24T06:00:30+5:30
मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : ताडाळी येथील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करून गावालगत
असलेल्या रेल्वेच्या पुलाखालून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला रेल्वेचे पत्र प्राप्त झाले आहे. सोबतच ताडाळी येथून तिसऱ्या रेल्वे लाईनच्या प्रस्तावित कार्याला कागदोपत्री सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वेने रहदारीसाठी सुचविलेला पुल येत्या काळात राहील की, नाही याबद्दल ताडाळी ग्रामपंचायत व नागरिक संभ्रमात पडले आहेत.
मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले. सदर पत्र प्राप्त होताच ग्रामपंचायत कार्यालयाकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. ताडाळी गावातून जाणारी प्रस्तावित तिसरी रेल्वे लाईन व ग्रामस्थांचा बंद होणारा मुख्य रस्ता याविषयी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढण्यासाठी ही ग्रामसभा महत्वाची ठरणारी होती. मात्र रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी या ग्रामसभेला उपस्थित झाले नसल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
उड्डाणपुलाची मागणी
ताडाळी हा एमआयडीसी परिसर असून परिसरातील कारखाण्यांमुळे येथे कामगार व मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. सोबतच पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच पा्रथमिक आरोग्य केंद्र यामुळे गावात सतत गजबज असते. शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे भविष्यात रहदारीची समस्या निर्माण होवू शकते. त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार रहदारीसाठी पायी मार्ग असावा व वाहनांसाठी उड्डाणपूल असावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.
या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत ताडाळीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांच्यासह सरपंच इंदिरा कासवटे, उपसरपंच क्रीष्णा बाम, ग्राम पंचायत सदस्य सुबोध कासवटे, साईबाबा झाडे, ज्योती आसेकर, प्रफुल गोठी, मनोज चिवंडे, कवडू दिवसे, खुशाल चिवंडे, अभय चिवंडे, दिनेश आमटे, पवन चनकापुरे, सुवर्णा सुरपाम यांच्या शिष्टमंडळाने संबंधितांना निवेदन दिले आहे.