ग्रामीण भागातील चिमुकले रोवणीच्या कामात गुंतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:29+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीकामे तशी नवीन नाही. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळांना मार्च महिन्यांपासून सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे शेती मशागत, पीक पेरणी, जनावरे सांभाळणे आदी कामासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांना हातभार लावत आहे. यावर्षी जून महिन्याचा आरंभ चांगल्या पावसाने झाला. मात्र कोरोनाचे संकट आल्याने सर्वांनाच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीची कामे आणि विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात दोन्ही एकाच महिन्यात सुरु होते. मात्र यावर्षी शेतीकामे सुरु झाली. मात्र शाळांना अद्यापही सुटी असल्यामुळे सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थीशेती कामात गुंतले आहे. अनेकजण आपल्या आई-वडीलांना शेतामध्ये मदत करीत आहे. या माध्यमातून शेतीव्यवसायाचे ते धडे घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात बघायचा मिळत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शेतीकामे तशी नवीन नाही. परंतु यावर्षी कोरोनामुळे शाळांना मार्च महिन्यांपासून सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे शेती मशागत, पीक पेरणी, जनावरे सांभाळणे आदी कामासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांना हातभार लावत आहे.
यावर्षी जून महिन्याचा आरंभ चांगल्या पावसाने झाला. मात्र कोरोनाचे संकट आल्याने सर्वांनाच कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या सावटात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन तसेच धान पेरणी केली. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता अद्याप शाळा सुरू झाल्या नाही. विद्यार्थ्यांसाठी काही शाळांनी आॅनलाईन धडे देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश पालक तसेच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, संगणक व नेटवर्क यापैकी कोणतेही साधन नसल्याने हा प्रयोग यशस्वी होणार नसल्याचे बोलल्या जात आहे. कोरोनाच्या काळात परीक्षा न देताच विद्यार्थी वरच्या वर्गात पोहचले. मात्र आता शाळाच नसल्याने घरी राहून काय, करायचे या विचाराने अनेक विद्यार्थी आपल्या आई-वडीलांना शेतीकामात मदत करीत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी रोवणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत या कामात मदत करीत आहे.