'आम्ही वाघाचे खाद्य आहोत का?' चंद्रपूरकरांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:20 IST2026-04-21T13:19:52+5:302026-04-21T13:20:23+5:30
Chandrapur : वाघाच्या वाढत्या दहशतीने त्रस्त झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अखेर थेट शासनालाच जाब विचारला आहे. आम्हालाही जगायचं आहे; मग आम्ही वाघाचे खाद्य आहोत का? असा थेट सवाल करत सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबवून आपली व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली.

'Are we tiger food?' Chandrapurkars angrily question the Chief Minister
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :वाघाच्या वाढत्या दहशतीने त्रस्त झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अखेर थेट शासनालाच जाब विचारला आहे. आम्हालाही जगायचं आहे; मग आम्ही वाघाचे खाद्य आहोत का? असा थेट सवाल करत सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबवून आपली व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस आणि महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग आंबटकर यांच्या पुढाकारातून हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले. रविवारी झालेल्या भेटीत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि संताप स्पष्टपणे मांडण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, जंगलालगतचे नागरिक दररोज जीव मुठीत धरून जगत आहेत. वाघांच्या हल्ल्यांत माणसं बळी जात असतानाही प्रशासनाकडून आर्थिक मदत देऊन जबाबदारी संपवली जाते. मूल येथे प्रस्तावित मालधक्का प्रकल्प रद्द करण्यामागे मूठभर लोकांच्या हिताचे राजकारण असल्याचा आरोप करत, या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणीही करण्यात आली.
तेंदूपत्ता संकलनासारख्या पारंपरिक रोजगारावर वाघाच्या भीतीमुळे मोठा परिणाम झाला आहे. लोहारडोंगरी येथील खनिज उद्योगाला दिलेली स्थगिती उठवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शोभाताई फडणवीस व पांडुरंग आंबटकर यांनी दिली.