बेफिकिरी भोवली; वेळीच सावध व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:44 AM2021-02-25T04:44:38+5:302021-02-25T04:44:38+5:30

सुधीर चेके पाटील। चिखली कोरोनामुळे गेल्यावर्षी तब्बल ७ महिने अक्षरश: घरातच काढावे लागले. ऑक्टोबरपासून थोडा दिलासा मिळत गेला. ...

Befikiri Bhovali; Be careful in time! | बेफिकिरी भोवली; वेळीच सावध व्हा !

बेफिकिरी भोवली; वेळीच सावध व्हा !

Next

सुधीर चेके पाटील। चिखली

कोरोनामुळे गेल्यावर्षी तब्बल ७ महिने अक्षरश: घरातच काढावे लागले. ऑक्टोबरपासून थोडा दिलासा मिळत गेला. कोरोनाबाधितांची संख्या अगदी शून्यावर आली. मृत्यूदरही घसरला, लस देखील आली अन् नागरिकांच्या मनातील भीती दूर झाली. परिणामी, मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे याकडे दुर्लक्ष तर झालेच याशिवाय लग्न समारंभ, सावडा-मौतीचे कार्यक्रम, निवडणुकीत आपण बेजबाबदारपणे वागलो... ही बाब सर्वांच्या अंगलट आली आणि 'सुपर स्प्रेडर'मुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला.

अवघ्या १५ दिवसात बाधितांचा आकडा पाचशेवर पोहचला असल्याने पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पाच नगर पालिका क्षेत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावला आहे. यामध्ये चिखली शहर व तालुकाभरात अवघ्या १५ दिवसात कोरोनाचा विस्फोेट झाल्याचे दिसून आले. 'लाकडाऊन'चा अनेकांनी विराेध केला. वस्तुत: आपणावर लॉकडाऊनची वेळ का आली याचे चिंतन होणे गरजेचे आहे. गतवेळी सर्वचजण सतर्क होते, नियम पाळल्या गेले त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. पण आता मात्र, कोरोनाची भीतीच उरली नाही, असे चित्र आहे. सध्या केवळ प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नियम पाळले जात आहेत, ही वस्तुस्थिती देखील नाकारता येत नाही. या निष्काळजीपणात सर्वात पुढे तरुणवर्ग असल्याचेही बोलल्या जात आहे. आताही अनेक तरुणांचा मास्क गळ्यातच लटकलेला असतो. फार क्वचितवेळा तो तोंडावर असतो. परिणामी तरुणवर्गाची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्याने त्यांना काही होत नसले तरी ते 'सुपर स्प्रेडर' म्हणून काम करतात. चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह येतो मात्र, कोरोना कॅरिअर म्हणून त्यांच्यापासून इतरांना बाधा होते. घरातील वृध्दांना यापासून सर्वाधिक धोका असून इतरत्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचं कारण देखील हेच सुपर स्प्रेडर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

तोरणदारी, मरणदारी पुन्हा गर्दी

अनलॉकनंतर मोठ्या संख्येने लग्न उरकण्यात आली. या लग्न सोहळ्यासह सावडा-मौतीच्या कार्यक्रमालाही हजारो नागरिकांची गर्दी मधल्या काळात पहावयास मिळाली. त्यातही तोरणदारी व मरणदारी जमणारी सर्व मंडळी जवळीच आहेत. त्यामुळे मास्क व इतर नियम पाळले नाही तरी चालते, ही बेफिकिरीच आता घातक ठरली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांतही उडाला फज्जा गत महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतही कोरोनाबाबत कमालीची बेफिकिरी दिसून आली. मतदानासाठी मोठ्या शहरात गेलेले अनेक नागरिक घरी परतले, मतमोजणीदरम्यानही प्रचंड गर्दी उसळली. या गर्दीत कोठेही सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होताना दिसला नाही. परिणामी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाला आहे.

गंभीरता हवीच !

सध्याचे चित्र पाहता हनुवटीवर अथवा गळ्याभोवती असलेला मास्क पुन्हा तोंडावर लावणे गरजेचे आहे., काहीच होत नाही, कोरोना नाहीच, हा केवळ स्कॅम आहे, असले गैरसमज मनातून काढणे टाकणे देखील गरजेचे आहे. नसता याचा फटका वृध्द व रोगप्रतिकारक्षमता कमी असलेल्या बसल्याशिवाय राहणार नाही. सोबतच कडक लॉकडाऊमुळे पुन्हा सर्वांवर घरी बसण्याची वेळ येणार असल्याने, ही बाब सर्वांनी गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.

Web Title: Befikiri Bhovali; Be careful in time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.