रेतीअभावी मजुरांवर बेरोजगारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:38+5:30

मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीतिरावर रेतीचे प्रसिद्ध घाट आहेत. तालुक्यातील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता फेब्रुवारी महिना जवळपास उलटून गेला तरी अद्याप शासकीय स्तरावर लिलावाची कारवाई सुरु झाली नाही. साधारणत: दीड महिन्यांचा कालावधी आणखी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणत: दोन महिने तरी रेती उपलब्ध होणार नसल्याचे मोहाडी तालुक्यात दिसत आहे.

Unemployment crisis on laborers due to sand | रेतीअभावी मजुरांवर बेरोजगारीचे संकट

रेतीअभावी मजुरांवर बेरोजगारीचे संकट

Next
ठळक मुद्देघाटलिलावाची प्रतीक्षा : बांधकाम व्यवसाय ठप्प, घरकुलालाही रेती मिळेना

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जिल्ह्यातील घाटांचे लिलाव अद्यापही झाले नसल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प पडला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे शेकडो बांधकाम मजूर संकटात आले आहे. घरकुल बांधकामालाही याचा फटका बसत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील रेतीची तस्करी परजिल्ह्यात धडाक्यात सुरु आहे.
मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीतिरावर रेतीचे प्रसिद्ध घाट आहेत. तालुक्यातील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता फेब्रुवारी महिना जवळपास उलटून गेला तरी अद्याप शासकीय स्तरावर लिलावाची कारवाई सुरु झाली नाही. साधारणत: दीड महिन्यांचा कालावधी आणखी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणत: दोन महिने तरी रेती उपलब्ध होणार नसल्याचे मोहाडी तालुक्यात दिसत आहे.
बांधकाम व्यवसायात तालुक्यातील अनेक मजूर गुंतलेले असतात. लघु व्यवसायही या बांधकामावर अवलंबून असतात. परंतु आता बहुतांश कामे बंद असल्याने मजुरांना काम मिळणे कठीण झाले आहे. अनेकांचे घरी रेतीअभावी आकारास येण्यास विलंब लागत आहे. मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक जण शहराकडे धाव घेत आहेत. एक घर बांधकामासाठी जवळपास कुशल-अकुशल असे दहा ते बारा मजूर लागतात. त्या अंदाजाने गाव व शहरांमध्ये २०० घरांचे बांधकाम सुरु असेल तर अडीच हजार मजुरांना रोजगार मिळतो. परंतु सध्या रेती उपलब्ध होत नाही. त्यामुळे बांधकाम ठप्प आहे. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलही ठप्प झाले आहेत. गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नाही. शासनाने विना रॉयल्टी रेती उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले असले तरी लिलावाअभावी घाटातून रेती काढणे कठीण जात आहे. सामाजिक संघटनांनी याकडे लक्ष देऊन रेती घाटाचा लिलाव तात्काळ व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

पूरक व्यवसायावरही अवकळा
रेतीअभावी घरकुलाचे बांधकाम बंद असल्याने पूरक व्यवसायावरही अवकळा आली आहे. तालुक्यात वीट भट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असतो. परंतु घर बांधकामच नाही तर विटांची मागणी नाही. सुतार आणि इतर मजुरांनाही बांधकामाचा फटका बसत आहे. पूरक व्यवसाय असलेले कुटुंब रोजगारासाठी भटकंती करीत आहेत.

Web Title: Unemployment crisis on laborers due to sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू