'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:20 IST2026-04-15T13:57:35+5:302026-04-15T14:20:03+5:30
खासदार राघव चड्ढा यांना काही दिवसापूर्वी राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले. पक्षाच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना चड्ढा म्हणाले की, त्यांचा आवाज दाबला आहे, त्यांचा पराभव झालेला नाही.

'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
आम आदमी पार्टीमधील अंतर्गत कलह आता समोर आला आहे. पंजाब सरकारने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना देण्यात आलेली 'Z+' श्रेणीची सुरक्षा काढून घेतली आहे. पंजाब पोलिसांनी गेल्या आठवड्यात चड्ढा यांचे सुरक्षा कवच हटवले. पंजाबमधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आल्यापासून चड्ढा यांना राज्य सरकारकडून सर्वोच्च स्तराची 'Z+' सुरक्षा पुरवण्यात आली होती.
पंजाबची सुरक्षा काढून घेतल्यानंतर, आता त्यांना केंद्रीय सुरक्षा कवच पुरवण्यात आले आहे. जोपर्यंत औपचारिक केंद्रीय व्यवस्था निश्चित होत नाही, तोपर्यंत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे.
राघव चड्ढा यांना नुकतेच राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले होते. पक्षाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना चड्ढा म्हणाले की, त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे, त्यांचा पराभव झालेला नाही.
चड्ढा संसदेत पंजाबचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्यापेक्षा केवळ वरवरच्या प्रसिद्धीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, असा दावा आपने केला आहे. त्यांच्यावर केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका न घेतल्याचा आणि विरोधी पक्षाच्या कृतींपासून स्वतःला दूर ठेवल्याचाही आरोप आहे.
हे आरोप फेटाळत, राघव चड्ढा यांनी सांगितले की, संसदेतील त्यांची भूमिका फक्त गोंधळ घालण्याची नाही, तर सार्वजनिक प्रश्न मांडण्याची आहे. त्यांच्या संसदीय कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना, त्यांनी 'आवाज उठवला, किंमत चुकवली' नावाचा एक व्हिडीओ शेअर केला.
आपल्या पदावरून हटवल्यापासून, राघव चड्ढा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष नेतृत्वाला सातत्याने आव्हान देत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे, यामध्ये चड्ढा यांनी 'नेव्हर आउटशाइन द मास्टर' नावाच्या पुस्तकातील एका प्रकरणाचा फोटो शेअर केला आहे. हा पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेलाी थेट टीका मानली जात आहे.