कृष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध मोहिमेत सहभाग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:58+5:30
केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे सन २०२० पर्यंत देश कृष्ठरोगाचे दुरीकरण करणे, समाजातील कृष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, सन २००३ पासून जिल्ह्यात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून केंद्र शासनाच्या सुचनेनुसार २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त देश करण्याचा संकल्प साध्य करावयाचा आहे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये संयुक्त कृष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान जिल्ह्यातील राबविण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हाधिकारी गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, डॉ. आर.एन. खंडागळे, सहायक संचालक आरोग्य सेवा कृष्ठरोग जिल्हा शल्चचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. समीर फराज, डॉ. वैभवी गभणे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक क्षयरोग चंद्रकांत बारई आशा समन्वयक राजकुमार लांजेवार, डॉ. पंकज पटले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नितीन तुरस्कर, आयएमए अध्यक्ष विणा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या सुचनेप्रमाणे सन २०२० पर्यंत देश कृष्ठरोगाचे दुरीकरण करणे, समाजातील कृष्ठरोगाचे निदान न झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, सन २००३ पासून जिल्ह्यात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून केंद्र शासनाच्या सुचनेनुसार २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त देश करण्याचा संकल्प साध्य करावयाचा आहे, समाजातील वय वर्षे ३० व अधिक वयोगटातील व्यक्तींची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग या आजाराचे प्रमाण कमी करणे, अभियान राबविण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण स्तरावर व शहरी भागात प्रशिक्षित टीमकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. टीममध्ये आशा स्त्री कार्यकर्ता व स्वयंसेवक असे दोन कर्मचारी राहतील घरोघरी जावून कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी व तिन्ही रोगाबाबत सविस्तर, माहिती देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम राष्ट्रीय अभियान असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातील सर्व जनतेला आलेल्या चमुला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.
कुष्ठरोग लक्षणे
त्वचेवर फिक्कट लालसर, बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट व चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयाचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे, तळ हातावर व तळ पायावर मुंग्या येणे, बधिरपणा अभवा जखमा असणे, हातापायाची बोटे वाकडी होणे, हात मनगटापासून किंवा पाय गुडघ्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हातापायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तु गळून पडणे, चालताना पायातून चप्पला गळून पडणे.
क्षयरोग लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला असणे, दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा ताप असणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवर गाठ, एचआयव्ही बाधीत रुग्ण मधुमेह रुग्ण, कुपोषीत रुग्ण.
असंसंर्गजन्य रोग लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा असणे तोंड उघडण्याकरिता त्रास होणे, स्तनामध्ये गाठ येणे, रक्तस्त्राव होणे, यासह अन्य लक्षणे दिसून येतात. याबाबत वेळीच दखल घेऊन उपचार करणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत राबविण्यात या उपक्रमाला नागरिकांचे सहकार्य मिळण्यासाठी यंत्रणेने दक्ष राहून कार्य करण्याचेही सांगण्यात आले.