उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:26+5:30
जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम सुरु असताना एका बाजूचा स्लॅब कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी तीन कामगार काम करीत होते. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथे निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपूलाचा स्लॅब गुरुवारी पहाटे कोसळला. पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तीन कामगार किरकोळ जखमी झाले. स्लॅब कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई - कोलकात्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी येथे उड्डाणपूलाचे काम गत दीड वर्षांपासून सुरु आहे. जेएमसी कंपनीच्यावतीने काम केले जात आहे. लाखनी लगतच्या मुरमाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुरमाडी नाल्यावर पुल बांधण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी पहाटे ३.४५ वाजता पुलाच्या काँक्रीट भरावाचे काम सुरु असताना एका बाजूचा स्लॅब कोसळला. त्यामुळे खळबळ उडाली. यावेळी तीन कामगार काम करीत होते. परंतु सुदैवाने त्यांना मोठी दुखापत झाली नाही. किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तेथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. .
लाखनी येथील केसलवाडा फाटा व पोलीस ठाण्याजवळ काम उड्डाणपुलाचे काम केले जात आहे. त्याअंतर्गत मुरमाडी नाल्याच्या दोन्ही बाजूला पूल तयार करण्याचे काम सुरु आहे.
मुरमाडी स्मशानभूमीच्या बाजूला पुलाचे काम सुरु असतांना अचानक स्लॅब पडल्याने कंपनीचे नुकसान झाले.
सदर बांधकाम कंपनीच्या कामावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सदर अपघाताच्यावेळी कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी मोठी घटना घडण्याची यापुढे शक्यता नाकारता येत नाही.
वाहतूक विस्कळीत
लाखनी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूलाचे काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या मधोमध पिल्लर उभारले असून रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य ठेवले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून याठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. पंरतु अतिव्यस्त राष्ट्रीय महामार्गावरुन अहोरात्र वाहने धावत असतात. त्यामुळे शहरात वाहतूकीची कोंडी होते. तासन्तास वाहनाची लांब रांग लागलेली असते. याचा फटका बसत आहे. अपघाताची कायम भीती आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आणखी येथे उपाययोजना करण्याची गरज आहे.