कोट्यवधींचा चुराडा तरीही पाण्यासाठी वणवण ! पाणीपुरवठा योजनांचे वास्तव समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 19:32 IST2026-04-11T19:27:00+5:302026-04-11T19:32:47+5:30
Bhandara : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे

Despite crores of rupees being spent, there is still a struggle for water! The reality of water supply schemes is revealed
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तुमसर तालुक्यातील चुल्हाड, गुढरी तर अड्याळ नजीकच्या सानगाव-देवरी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने लाखनी तालुक्यातील देवरी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सानगाव येथे पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २०२२ मध्ये सरु यालेल्या 'हर घर जल' योजनेतून काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. परंतु नंतर विविध अडचणी निर्माण झाल्या. टाक्यांची गुणवत्ता खराब असल्याने प्लास्टिकच्या दोन टाक्या अल्पावधीतच फुटल्या. सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या या गावात पाण्यासाठी अक्षरशः हाहाकार उडाला आहे.
आठ महिन्यांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना विहिरीतून किंवा बोरिंगद्वारे पाणी भरावे लागत आहे. विशेषतः महिलांना यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठीही पाण्याची कमतरता जाणतत आहे आगामी काळात गावात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्नही ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. पाणीटंचाई दूर करण्याची मागणी अर्चना त्रिपाठीसह शामकला निकुरे, मंगला ठाकरे, जयश्री कोरे, वंदना नागोसे, कविता कामडे, अर्चना ठाकरे, यशोदा मेश्राम मीनाक्षी उईके यांनी केली आहे.
गुढरीवासियांची मदार बोअरवेलवर
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना तुमसर तालुक्यातील गुढरी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. गावातील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची पूर्ण मदार आता बोअरवेलवर आहे. गावात नळ योजनेतून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना दररोज बोअरवेलवर रांगा लावून पाणी भरावे लागत आहे. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी दैनंदिन कामे अडचणीत येत असून जनावरांसाठीही पाण्याची टंचाई जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. येथे पाच वर्षांपासून पाण्यासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही.
"समस्या सुटावी यासाठी सरपंचांकडे तक्रार केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी महिलांची पाण्यासाठी पायपीट वाढली आहे."
- अर्चना त्रिपाठी, ग्रामपंचायत सदस्य सानगाव