बीड : ७३ कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ताब्यात घेतल्याने महसूल विभागात भूकंप झाला असतानाच, आता त्यांच्या नियुक्तीबाबत आणि कार्यपद्धतीबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यानेच पाठक यांना बीडचे जिल्हाधिकारी म्हणून आणले होते, असा थेट आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.
अविनाश पाठक यांची २२ एप्रिल २०२५ रोजी बीडमधून बदली झाली. त्यांच्या कार्यकाळात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक बड्या नेत्यांनी मस्साजोगला भेट देऊन सांत्वन केले; मात्र जिल्ह्याचे पालक असलेल्या अविनाश पाठक यांनी कधीही पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही. विशेष म्हणजे, पाठक आठवड्यातून किमान दोन वेळा लातूरला जात असत. लातूरला जाण्यासाठी त्यांना मस्साजोगवरूनच जावे लागते आणि संतोष देशमुख यांचे घर मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही त्यांनी कधी आपली गाडी तिकडे वळवली नाही, याबद्दल धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुख्य आरोपीशी ‘साटेलोटे’?
‘जिल्हाधिकारी पाठक हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या शब्दाखातरच बीडमध्ये आले होते. त्यामुळेच त्यांनी कधी मस्साजोगची पायरी चढली नाही,’ असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही जिल्हाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी असतानाही, ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलने केली, जलसमाधीचा इशारा दिला; मात्र पाठक यांनी कधीही आंदोलकांशी संवाद साधण्याची तसदी घेतली नाही.
Web Summary : Brother alleges ex-Collector Avinash Pathak's appointment was influenced by murder accused Valmik Karad. Pathak neglected victim's family despite proximity, raising suspicions of collusion. Accusations include ignoring protests and prioritizing personal trips over duty.
Web Summary : भाई का आरोप है कि पूर्व कलेक्टर अविनाश पाठक की नियुक्ति हत्या के आरोपी वाल्मीक कराड से प्रभावित थी। पाठक ने पीड़ित परिवार की उपेक्षा की, जिससे मिलीभगत का संदेह है। आरोपों में विरोधों को अनदेखा करना और कर्तव्य से ऊपर व्यक्तिगत यात्राओं को प्राथमिकता देना शामिल है।