भाईपूर शिवारातील शेतीचा झाला तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:28+5:30
नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकºयांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : एच.जी. इन्फ्रा कंपनीच्यावतीने मोर्शी-वरूड मार्गातील सीमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे भाईपूर शिवारातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी गोळा होऊन परिसर जलमय होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासंबंधी तक्रार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अमरावती येथील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आली आहे.
नांदगाव पेठ, मोर्शी, वरूड ते पांढुर्णा या चौपदरी महामार्गाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. कंत्राटदार एच.जी. इन्फ्रा कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी थांबणार नाही याबाबत नियोजन अपेक्षित होते. मात्र, या सुविधेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही कंपनीकडून कार्यवाही झालेली नाही. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे राहुल ढोले यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेती जलमय झाली आहे.
राहुल ढोले यांच्या शेतासमोर पाईपचा एक छोटा पूल कंपनीने तयार केला. मात्र या पुलाखालून पावसाचे पाणी जात नाही. तद्वतच आजूबाजूचे पाणी बाहेर निघायला मार्ग नसल्यामुळे ते पाणी पूर्णत: शेतात गोळा होते. याविषयीची तक्रार ढोले यांनी ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी ३१ जानेवारी व १२ फेब्रुवारी रोजी कंत्राटदार कंपनीला पत्र देऊन पाणी व्यवस्थापन योग्य न झाल्याचे कळविले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे यावर्षीच्या पावसाने दाखविले. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरून संपूर्ण पिके खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी बोगस बियाण्यांमुळे हैराण आहेत. हजारो रुपयांचे बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, ते बियाणे उगवले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यानंतर जे बियाणे उगवले, त्यापासून होणारे उत्पादन समाधानकारक नसल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. त्यामध्येसुद्धा शेतकरी भरडला. आता पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे तिसºयांदा पेरणी करण्याचे वा जमीन नापेर ठेवण्याचे संकट परिसरातील शेतकºयांवर ओढवले आहे. याप्रकरणी कंत्राटदार कंपनीकडून शासनाने नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे कुणी ऐकेल की नाही?
शेतीमध्ये अपार कष्ट करून पीक पिकविले तेव्हाच वर्षभराची आर्थिक तरतूद करता येते. मात्र, भाईपूर शिवारातील शेतकºयांना दोन वर्षांपासून थातूरमातूर पिकवून गुजराण करावी लागत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी पेरावे आणि पावसाने जोर धरला की, तेच पीक पाण्याखाली सडत असल्याचे डोळ्यांदेखत पाहावे, यातील यातना प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, कंत्राटदार कंपनीपैकी कुणी ऐकेल की नाही, असा प्रश्न पाण्याखाली शेती गेलेल्या शेतकºयांनी उपस्थित केला आहे.