लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : तालुक्यातील मुऱ्हादेवी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाच घरे जळून खाक झाली. गोठ्यात बांधलेले तीन बैल, एक म्हैस, बोकडाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही भीषण आग आटोक्यात आणण्याकरिता दर्यापूर, आकोट, अचलपूरहून अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.उन्हाचा पारा वाढताच अंजनगाव तालुक्यात आगीचा प्रकोप वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी निमखेड बाजार येथे भीषण आगीत मोठे नुकसान झाले.बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच होरपळून दगावले, तर एक बैल पूर्णत: भाजला गेला. एक म्हैस आणि एक बोकडसुद्धा दगावला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी सलीम यांनी ७५ हजारांचीबैलजोडी आणि ६० हजारांची म्हैस घरातील सर्व पुंजी खर्चून आणली होती. गोठ्याला आग लागल्यानंतर जनावरांना सोडण्यास गेलेल्या अ. सलीमदेखील भाजले गेले. शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजार जळाल्याने मोठे नुकसान झाले. अतुल पखान यांचे शेतीपयोगी अवजार जळाले. आग आटोक्यात आणण्याकरिता ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा केला. मात्र, आग आटोक्यात येण्याचे नाव घेत नव्हती.अग्निशमन वाहन नादुरुस्तअंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने दर्यापूर, अचलपूर, अकोट येथील बंब बोलावण्यात आले. यानंतर आग आटोक्यात आली. वृत्त लिहिस्तोवर महसूल प्रशासन घटनास्थळाचा पंचनामा करीत होते. तहसीलदार विश्वनाथ घुगे, चिंचोली रहिमापूरचे ठाणेदार जमील शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.दर्यापूरला फोन कराअंजनगाव नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बुधवारीही कुचकामी ठरले. आमचे वाहन नादुरुस्त आहे. दर्यापूरला फोन करा, असा सल्ला ग्रामस्थांना मिळाला. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असताना तालुक्यात एकही अग्निशमन वाहन नसल्याने आमदारांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी चर्चा आहे.
भीषण आग, पाच घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:00 AM
बुधवारी मुऱ्हा देवी येथे दुपारी १.३० वाजता मोठी आग लागून अ. सलीम शे. नजीर, शिवदास पखान, हरिदास पखान, अ. कदीर शे. बशीर यांची घरे जळून खाक झाली. जीवनावश्यक वस्तूंसह शेतीपयोगी अवजारेही जळाल्याने ऐन मशागतीच्या दिवसांत त्यांची पंचाईत झाली आहे. या आगीत अ. सलीम शे. नजीर यांचे दोन बैल जागीच होरपळून दगावले, तर एक बैल पूर्णत: भाजला गेला.
ठळक मुद्देमुऱ्हादेवी येथील घटना : गोठ्यात बांधलेली पाच जनावरेही मृत्युमुखी