आर्णी, यवतमाळ, घाटंजीत तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:11+5:30
मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार १९० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील सहा हजार ८३८ जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात ५५९ कोरोना अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ५४३ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्या आले आहे. रविवारी २९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचे मृत्यूसत्र आता सर्वत्र पसरत असून रविवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात यवतमाळातील ५८ वर्षीय, घाटंजी शहरातील ५५ वर्षीय पुरुष आणि आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या २५५ झाली आहे.
रविवारी जिल्ह्यात आणखी ९५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात ६९ पुरुष व २६ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या ९५ रुग्णांपैकी तब्बल ४९ रुग्ण एकट्या यवतमाळातील आहे. त्यात शहरातील ३० पुरुष, १६ महिला आणि तालुक्यातील दोन पुरुष, एका महिलेचा समावेश आहे. शिवाय आर्णी एक, बाभूळगाव एक, दारव्हा चार, दिग्रस चार, कळंब सहा, महागाव १२, पांढरकवडा एक, पुसद दोन, राळेगाव एक, उमरखेड एक, वणी १२ तर झरी जामणीतील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
मार्चपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार १९० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यातील सहा हजार ८३८ जण बरे झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. सध्या जिल्ह्यात ५५९ कोरोना अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर ५४३ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्या आले आहे. रविवारी २९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने जिल्ह्यातील ७२ हजार ७६६ नागरिकांचे स्वॅब नमुने आजपर्यंत तपासणीसाठी पाठविले. त्यातील ७१ हजार ७०२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ६३ हजार ५१२ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही १०६४ नमुन्यांचे अहवाल येण्याची वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला प्रतीक्षा आहे. एकंदर २५५ नागरिकांचे बळी गेल्याने प्रशासनही आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहे. तर नागरिकांच्या मनातही धास्ती निर्माण झाली आहे.
२९६ जणांना सुटी
एकीकडे कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून पूर्णपणे मुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी जिल्ह्यातील तब्बल २९६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत एकंदर ६ हजार ८३८ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.