नेर शहरात लॉकडाऊनमध्येही चोरट्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:28+5:30
दोन दिवसात नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फुटली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलून नेला. तेलाचे पिपे, किराणा माल चोरटे खरेदी केल्याप्रमाणे अंगाखांद्यावरून घेऊन जातात. ही बाब सर्वांनाच धक्का देणारी आहे. राजरोसपणे चोरी करण्याचे बळ या चोरट्यांकडे आले कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : मध्यरात्रीनंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडावे, अशा पद्धतीने चोरटे नेरच्या बाजारपेठेत फिरत आहेत. एक-दोन नव्हे तर २०-२५ जणांचा जत्था बाजारपेठेतील दुकानांना लक्ष्य करत असल्याचे दिसून येते. चोरट्यांची संपूर्ण हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावरून त्यांना कुणाचेही भय नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्री दुकान फुटले की नाही हे पाहण्यासाठी दिवसा व्यापारी घराबाहेर पडत आहे.
दोन दिवसात नेर शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन दुकाने फुटली. यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी उचलून नेला. तेलाचे पिपे, किराणा माल चोरटे खरेदी केल्याप्रमाणे अंगाखांद्यावरून घेऊन जातात. ही बाब सर्वांनाच धक्का देणारी आहे.
राजरोसपणे चोरी करण्याचे बळ या चोरट्यांकडे आले कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने चोर रस्त्यावर फिरत असताना बंदोबस्त व पेट्रोलिंगचे पोलीस करतात काय, यावरही संशय व्यक्त होत आहे. सब्बल, सळाख यासारख्या साहित्याच्या आधारे शटरचे कुलूप तोडून किंवा शटर वाकवून चोरी होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्ट दिसूनही त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. शहरातील अमरावती रोडवर शेखर मालानी आणि भिकेश मालानी यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरी झाली. या चोरीच्या पद्धतीने ही टोळी एकच असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यवतमाळ शहरातही अशाच पद्धतीने दुकान फोडण्याच्या घटना सातत्याने घडल्या होत्या. अद्यापपर्यंत पोलीस या चोरट्यांचा सुगावा लावू शकलेले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चोरट्यांची टोळी हाती लागत नाही तोपर्यंत हा तपास सोडू नये. सध्या व्यापारी वर्ग लॉकडाऊनमुळे घरी बसून आहे. मात्र त्यांची दुकाने व लाखोंचा मुद्देमाल बाजारात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.