सात प्रकल्प तुडुंब भरले, उन्हाळ्यातील पाणीटंचाई मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:00 AM2021-09-22T05:00:00+5:302021-09-22T05:00:16+5:30
सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदा जिल्ह्यात पाऊस धुव्वाधार बरसला. गेल्या दोन दिवसात तर सततच्या पावसाने जिल्ह्यातील महत्वाचे सात प्रकल्प तुडुंब झाले आहे. तर अन्य तीन मोठे प्रकल्पही ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटणार आहे.
सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभरही कायम हाेता. अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे पूस धरण, गोखी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि नवरगाव ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शिवाय अरुणावती ९८.६५ टक्के, बेंबळा ९३.३८ टक्के तर अडाण प्रकल्प ९५.८८ टक्के भरला आहे. निळोणा प्रकल्प यापूर्वीच तुडुंब भरला आहे. विविध ठिकाणच्या या प्रकल्पातून पुसद, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी अशा महत्वाच्या शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. हे प्रकल्प भरल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता जवळपास संपली आहे. पावसामुळे सध्या नुकसान सोसावे लागत असले तरी भविष्यात या पावसाचा जिल्ह्याला भरपूर फायदा होणार आहे. दरम्यान, अद्यापही विविध ठिकाणी पावसाळी वातावरण कायम आहे.