निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:31 IST2026-04-29T06:30:32+5:302026-04-29T06:31:30+5:30
२९ तारखेला प. बंगालमध्ये मतदान आहे. त्यानंतर ४ मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्या दरम्यान पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.

निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
नवी दिल्ली - युद्धामुळे महाग झालेल्या कच्च्या तेलामुळे आणि डॉलर महागल्याने आता विधानसभा निवडणुका होताच भारतात पेट्रोल-डिझेलचे दर किमान ५ रुपयांनी वाढतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या भारताला महाग कच्चे तेल आयात करावे लागत आहे. इतर देशांनी महाग कच्च्या तेलामुळे आधीच पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. भारतात पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे ही दरवाढ थांबवण्यात आली होती, अशी चर्चा होती. आता २९ तारखेला प. बंगालमध्ये मतदान आहे. त्यानंतर ४ मे रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्या दरम्यान पेट्रोल-डिझेलची दरवाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या दरवाढीची शक्यता व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कृत्रिमरीत्या इंधन दर नियंत्रणात ठेवले आहेत. मतदान संपल्यानंतर दरवाढ केली जाऊ शकते, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
तेल कंपन्यांवर काेट्यवधींचा ताण
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यामागे सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांना ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या कंपन्यांना दररोज अंदाजे २,४०० कोटी रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती आहे.
नागरिकांनी पॅनिक बायिंग करू नये...
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. नागरिकांनी पॅनिक बाइंग करू नये. इंधन पुरवठा सुरळीत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पेट्रोलियम खात्याच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा म्हणाल्या.