परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:18+5:30
पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळे शेतकरी परंपरागत पिकांच्या लागवडीबाबत साशंक झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परतीचा पाऊस हा १५ सप्टेंबरपर्यंत कोसळतो. यावर्षी पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. हा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे खरीपाचा हंगाम धोक्यात आला असून शेतकरी संकटात आला आहे.
पर्यावरण असंतुलनामुळे ऋतुचक्र प्रभावित झाले आहे. कधी पावसाळा लांबतो तर कधी मोठा खंड पडतो. मागील चार वर्षात परतीच्या पावसाचा कालावधी वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना याचा फटका बसत आहे. पीक घरात येईपर्यंत कुठले संकट ओढवेल याची शाश्वतीच राहिली नाही. त्यामुळे शेतकरी परंपरागत पिकांच्या लागवडीबाबत साशंक झाला आहे. अति पाऊस - कमी पाऊस हे संकट सातत्याने सहन करावे लागत आहे. बदलत्या ऋतुमानानुसार कृषी शास्त्रज्ञांनी नव्या वाणाचा शोध लावण्याची गरज निर्माण झाली आहे. दुर्दैवाने देशात पिकांबाबत ऋतुमानानुसार संशोधन झालेच नाही. यावर हवामान अभ्यासकाच्या परिषदेत डॉ. सुरेश चोपणे यांनी चिंता व्यक्त केली. यावर्षीही अति पावसाने सोयाबीन व कपाशीचे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. सर्वाधिक लागवड खर्च असलेली कपाशी यावर्षी संकटात सापडली आहे. या वातावरणामुळे कृषी अभ्यासकांनी यावर्षी उत्पादनामध्ये मोठी घट येण्याचा धोका वर्तविला आहे. शेतकऱ्यांना पर्यायी पीक उपलब्ध नसल्याने परंरागत पद्धतीने शेती करावी लागत आहे. कृषी विद्यापीठांनी बदल्या ऋतुमानानुसार संशोधित वाण बाजारात आणले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चही उत्पादनातून मिळत नाही.
कृषीचे अर्थचक्र मोसमी पावसावर अवलंबून आहे. यावर्षी परतीच्या पावसाने हे अर्थचक्र बिघडविले आहे. २४ सप्टेंबरला नागपूर विद्यापीठात विदर्भाचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण यावर परिषद झाली. त्यात विदर्भातील हवामान अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली.
- डॉ. सुरेश चोपणे
हवामान अभ्यासक