दलित वस्तीसाठी तीन नवीन टाक्या प्रस्तावित

By Admin | Updated: May 30, 2016 00:04 IST2016-05-30T00:04:43+5:302016-05-30T00:04:43+5:30

शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते.

Proposed three new tanks for Dalit habitation | दलित वस्तीसाठी तीन नवीन टाक्या प्रस्तावित

दलित वस्तीसाठी तीन नवीन टाक्या प्रस्तावित

 ७० लाखांचा निधी : राजारामनगर, गौतमनगर, पाटीपुराचा प्रश्न सुटणार
यवतमाळ : शहरातील जुन्या वस्तीला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे राजारामनगर, पाटीपुरा, गौतमनगर परिसरातील नागरिकांना बारमाही पाणी टंचाई सोसावी लागते. या भागाला योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी दलित वस्तीच्या निधीतून तीन टाक्या बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यावर ७० लाख ८५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे.
राजारामनगर, अंबिकानगर या परिसरासाठी कपिल वस्तूनगरातील खुल्या जागेत २३ लाख रुपये खर्चून टाकी बांधण्यात येणार आहे. याचप्रमाणे गौतमनगर, तलावफैल भागासाठी वंजारी फैलामध्ये खुल्या जागेत २३ लाखांची पाण्याची टाकी बांधली जाणार आहे. पाटीपुरा, सेवानगर परिसरासाठी नागपूर मार्गावर असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या जागेत पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मागास वस्त्यांमधील पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी माजी बांधकाम सभापती प्रणिता खडसे आणि भाजपाचे शहराध्यक्ष विजय खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रस्तावाला नगरपरिषदेच्या ८ आॅगस्ट २०१४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.
हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आला. पाणीपुरवठा टाकीची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा विषय १८ मे रोजी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आता तिन्ही टाक्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी प्रणिता खडसे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Proposed three new tanks for Dalit habitation