ओमायक्राॅनने प्रवाशांचे तिकीट रद्द; लाॅकडाऊनची घेतली धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:37+5:30
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनमुळे दररोज नवीन सूचना प्राप्त होत आहे. अशात बाहेरगावी गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन लागले तर काय करायचे म्हणून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. याशिवाय हाॅटेल, माॅल आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स याशिवाय लसीकरणही सक्तीचे आहे. यामुळे प्रवाशांना धाकधूक वाटत आहे.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राॅनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येकांना खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. विशेषत: बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांची चाैकशी होत आहे. याच प्रमुख कारणाने अनेक प्रवाशांनी बाहेरगावचा प्रवास रद्द केला आहे.
बाहेरगावी गेल्यानंतर अशा व्यक्तींशी संपर्क आला तर मोठी पंचाईत होईल अशी भीतीही अनेकांना वाटत आहे. याशिवाय लाॅकडाऊन जाहीर झाले तर काय करावे आणि आरटीपीसीआर टेस्टमध्ये पाॅझिटिव्ह आलो तर क्वारंटाइन राहावे लागेल, यामुळे प्रवाशांनी रेल्वेचा प्रवास रद्द करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
कठोर नियमावली
- रेल्वेमध्ये प्रवास करताना पूर्वी एसी डब्यामध्ये ब्लँकेट मिळायचे. आता हे ब्लँकेट कोरोना काळापासून बंद करण्यात आले आहे. प्रवाशांना स्वत: तशी व्यवस्था करावी लागत आहे. आता बाहेर ठिकाणी जाताना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची आहे.
नवीन नियमावलीने धाकधूक वाढली
- कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनमुळे दररोज नवीन सूचना प्राप्त होत आहे. अशात बाहेरगावी गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन लागले तर काय करायचे म्हणून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. याशिवाय हाॅटेल, माॅल आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स याशिवाय लसीकरणही सक्तीचे आहे. यामुळे प्रवाशांना धाकधूक वाटत आहे.
- मला दहा दिवसांसाठी मुंबईला जायचे होते. मात्र मुंबईमध्ये बाहेरदेशातीलही लोक असतात. या ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर झाले तर अडचणी आहेत.
- बस नसल्याने रेल्वेकडे सर्वाधिक कल आहे. यातून बुकिंगही सुरू आहे आणि नवीन व्हायरसमुळे तिकीट रद्द करण्याचे प्रमाणही वाढले आहे.