ट्रकचालक शॉर्टकट घ्यायला गेला अन् होत्याचे नव्हते झाले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 09:21 IST2026-05-19T09:21:31+5:302026-05-19T09:21:43+5:30
- सुरेश काटे लोकमत न्यूज नेटवर्क तलासरी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे बापूगाव येथून खडकीपाडा येथे साखरपुड्यासाठी वऱ्हाड घेऊन येणाऱ्या ...

ट्रकचालक शॉर्टकट घ्यायला गेला अन् होत्याचे नव्हते झाले...!
- सुरेश काटे
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे बापूगाव येथून खडकीपाडा येथे साखरपुड्यासाठी वऱ्हाड घेऊन येणाऱ्या ट्रकला सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कंटेनरची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. ट्रकचालक शॉर्टकट घ्यायला गेला अन् १३ जणांचा मृत्यू झाला. सर्व्हिस रोड असता तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, असे मत काही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केले.
वळसा टाळण्यासाठी खटाटोप
धानिवरी खडकीपाडा येथे जाण्यासाठी महामार्गावर हॉटेल तुळशी येथून येऊन युटर्न घेऊन पुन्हा मागे यावे लागणार होते. हा मोठा वळसा टाळण्यासाठी टेम्पो चालकाने धानिवरी पुलाखालून वळण घेतले. तेथून खडकीपाडा ५०० मीटरवर असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो विरुद्ध दिशेने नेला.
मात्र हीच चूक अनेकांचे आयुष्य संपवणारी ठरली. टेम्पो विरुद्ध दिशेने जात असताना समोरून पहिल्या लेनवरून येणाऱ्या कंटेनर डिव्हायडरवर चढून त्यावरील कंटेनरचा पुढील भाग या टेम्पोवर पडल्याने मोठा अपघात झाला. अपघात घडताना घटनास्थळाच्या जवळ राहणारे कुमार मलावकर आणि गावकरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
रिक्षाचालक धावला मदतीला
टेम्पोतील किरकोळ जखमी झालेल्या लोकांनी टेम्पोतील अन्य गंभीर लोकांना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने कासा रुग्णालयात पाठविले. तसेच प्रकाश बाहोटा या रिक्षाचालकाने देखील आपल्या रिक्षातून जखमींना रुग्णालयात नेले. यावेळी अपघातानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी तत्काळ आली. त्यातून जखमींना कासा तसेच वेदांत रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धानिवरी येथे पुलाच्या बाजूने सर्व्हिस रोड असता तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, असे मत पालघर जिल्हा परिषदेचे
माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांनी व्यक्त केले.